ओळख पटली! सूत्रधार पकडा!

ओळख पटली! सूत्रधार पकडा!
‘अंधश्रद्धा निर्मूलक’ डॉ. नरेंद्र दाभोलकर, श्रमजीवींच्या हक्कांसाठी संघटित लढा देणारे कॉम्रेड गोविंद पानसरे, कर्नाटकातील संशोधक साहित्यिक एम.एम. कलबुर्गी, ‘सत्यशोधक-संपादक’ गौरी लंकेश; ही काही अपार लोकप्रियता मिळवलेली वा आपल्या विचार-कार्याने निवडणुकांत जनमत बदलवणारी माणसं नव्हती. किंबहुना, जनमताच्या रोषाला हिमतीने सामोरे जात सत्य-असत्याचं दर्शन-प्रदर्शन घडवण्याचं काम ते सातत्याने करीत होते. ‘काम लोकहिताचं, पण ते ज्यांच्यासाठी करायचं त्यांचीच पाठ!’ असा विपरीत अनुभव पचवत ते आपले काम चिकाटीने करीत होते.
तरीही त्यांच्या २०१३ ते २०१५ ह्या काळात एका पाठोपाठ एक निर्घृण हत्या झाल्या. कारण देशात आज जे ताणतणावाचं वातावरण आहे, त्याची पाळंमुळं रुजू नयेत, यासाठी त्यांचा लोकजागृतीचा आटापिटा सुरू होता. त्याला मर्यादा होत्या. त्यामुळे विधानसभेतील ‘भाजप’च्या १२ आमदारांचं निलंबन होताच, जशा ‘लोकशाहीचा खून’ झाल्याच्या बोंबा उठल्या; तशा लोकशाहीची मूल्यं जतन करण्यासाठी आयुष्याची बाजी लावणार्या ह्या चौघांच्या हत्या झाल्यावर ‘लोकशाहीचा खून झाला’ अशा घोषणा देत रस्त्यावर जथे उतरले, असे झाले नाही. उलट, ‘त्यांच्या हत्या वेगळ्याच कारणासाठी झाल्या,’ अशी त्यांची बदनामी करणार्या कुजबुज चर्चा सुरू झाल्या. हा सामाजिक उफराटेपणा सनातन आहे.
असो. या चारातील पहिली हत्या डॉ. दाभोलकर यांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ ला झाली. त्यांची हत्या केल्याचा आरोप असलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात आता (१९ मार्च) रोजी ओळखले आहे. ‘अंदुरे व कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला आणि पळ काढला,’ असं त्यांनी न्यायालयाला सांगितलंय. विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांच्यापुढे पुणे न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू असून या प्रकरणात ‘सनातन संस्था’शी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, ॲड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्यासह आता सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्यावरही आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
औरंगाबाद येथे राहणाऱ्या सचिन व शरद यांना ऑगस्ट २०१८ मध्ये अटक झाली. मुंबई-विरार दरम्यानच्या नालासोपारा येथे राहणारा ‘सनातन साधक’ वैभव राऊत याच्या घरी ATS (अँटी टेररिस्ट स्क्वाॅड) ने टाकलेल्या धाडीत शस्त्रं व स्फोटकाचा साठा सापडला. त्यावेळी वैभव राऊत याच्या चौकशीतून सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर, गणेश कपाळे, अविनाश पवार यांच्यासह सचिन व शरद यांची नावं पुढे आली. यातून स्फोटकांचं नालासोपारा, जळगाव, जालना, सातारा, कोल्हापूर, मुंबई असं मोठं ‘कनेक्शन ओपन’ झालं. सचिन अंदुरेला औरंगाबादेतील राहत्या घरातून अटक झाली; तर शरदला कोल्हापुरात अटक झाली. ह्या दोघांच्या चौकशीतून ॲड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची नावं पुढे आल्यावर त्यांनाही मे २०१९ मध्ये अटक करण्यात आले. विशेष म्हणजे, संजीव पुनाळेकर हे ‘टीव्ही मीडिया’तून ‘सनातन’ संस्थेचे प्रवक्ते म्हणून बाजू मांडत होते; तसेच डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरे हत्या खटल्यात संशयित आरोपीचे वकील म्हणून काम पाहात होते. त्यांच्यावर हत्येच्या कट-कारस्थानाबरोबरच हत्येसाठी वापरलेले पिस्तुल नष्ट करण्यासाठी ते ठाण्याच्या खाडीत फेकून केल्याचा आरोप आहे.
या कारस्थाना संबंधाने विक्रम भावे ह्यालाही आरोपी करण्यात आले. ३१ मे २००८ रोजी ठाण्याच्या गडकरी नाट्यगृहात आणि ४ जून २००८ रोजी नवी मुंबई- वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘आम्ही पाचपुते’ या नाटकाच्या वेळी बॉम्बस्फोट झाले; तेव्हा ‘सनातन संस्था, पनवेल’शी संबंधित सहा जणांना अटक झाली. त्यात विक्रम भावे होता. त्याच्या वतीने
ॲड. संजीव पुनाळेकर यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दिल्यावर ३० ऑगस्ट २०११ रोजी न्या. पी.बी. हरदास आणि न्या. मृदुला भाटकर यांनी २०,००० रुपयांच्या जामिनाला मंजुरी दिली आणि विक्रम भावेची सुटका झाली.
दरम्यान, ‘गडकरी व भावे नाट्यगृह बाॅम्बस्फोट’ प्रकरणाच्या खटल्यात आरोपी असलेल्या रमेश गडकरी आणि विक्रम भावे यांना न्यायालयाने १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ते प्रकरण वरच्या कोर्टात अपिलात असतानाच ; डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अटक झालेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याच्या चौकशीनंतर विक्रम भावे यालाही अटक करण्यात आले. म्हणजे बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात जामिनावर सुटल्यावर भावे ह्याने डॉ. दाभोलकरांच्या खूनाचा आरोप अंगावर घेण्याचा पराक्रम केला होता. ह्या प्रकरणातही त्याची एक लाखाच्या जामिनावर न्यायालयाने सुटका केली. दरम्यान, त्याने ‘मालेगाव बॉम्बस्फोटातील अदृश्य हात’ हे पुस्तकही लिहिलंय.
‘नालासोपारा शस्त्रं-स्फोटक साठा’ प्रकरण ‘फडणवीस सरकार’च्या काळात बाहेर आल्यामुळे डॉ. दाभोलकर हत्येचे सचिन व शरद यांच्यापर्यंत पोहोचवणारे धागेदोरे तपास यंत्रणेच्या हाती लागले. तथापि, ATS ने ही धाड कर्नाटकाच्या तपास यंत्रणेमुळे घातली होती. ती यंत्रणा कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येचा मागोवा घेत नालासोपारापर्यंत पोहोचली होती. (तेव्हा कर्नाटकात ‘काँग्रेस-जनता दल’चे सरकार होते.) सचिन आणि शरद यांनी अटक होताच आपण डॉ. दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित असल्याची कबुली दिली होती.
—— 2——
अंदुरे-कळसकर… धर्मासाठी लटकले?
सचिन आणि शरद ह्या दोघांचीही कौटुंबिक स्थिती साधी-गरीब आहे. एक मुलगी असलेला सचिन कापडाच्या दुकानात काम करायचा; तर शरद कोल्हापुरात ‘आयटीआय’चे शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत होता. औरंगाबाद जिल्ह्यातील केसापुरीचा शरद हा अल्पभूधारक शेतकर्याचा मुलगा. गावात २०१० मध्ये हिंदुत्ववादी संघटनेचा धार्मिक कार्यक्रम झाला, तेव्हा तो १६ वर्षांचा होता; आणि दाभोलकरांचा खून करण्यासाठी त्याची निवड २०१२ मध्ये झाली, तेव्हा तो १८ वर्षांचा होता. वयाच्या १९ व्या वर्षी त्याने दाभोलकरांची हत्या केली. एवढ्यावरच तो न थांबता, आपल्या साथीदारांसह पुढील खूनाच्या नियोजनात गुंतला होता.
बारावीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर शरदने गाव सोडलं आणि कोल्हापूरला गेला. तिथे आपण ‘टर्नर-फिटर’चं काम करीत असल्याचं त्याने घरच्यांना सांगितलं होतं. चारपाच महिन्यांनी घरी यायचा. घरच्यांना ५-१० हजार रुपये द्यायचा. कोल्हापुरात चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उद्योग उभारणार असल्याचं स्वप्न; तो घरच्यांना ऐकवायचा. पण त्याचे वेगळेच उद्योग सुरू आहेत, ह्याची पुसटशीही कल्पना घरच्यांना नसावी.
२०१० साली गावातल्या धार्मिक कार्यक्रमात जाणारा शरद २०१९ मध्ये दाभोलकरांच्या खून प्रकरणाचा आरोपी म्हणून पकडला जाईल, ह्याची अंधुकशी कल्पना दरम्यानच्या ७ वर्षांच्या काळात त्याच्या पालकांना का आली नसेल ? त्यांना आता आपला मुलगा ‘भगतसिंग’सारखा वाटत असेल का ? हे प्रश्न शरदच्या पालकांपुरतेच मर्यादित नाहीत. सचिन, वैभव, गणेश, श्रीकांत, अविनाश अशी ही मोठी यादी आहे.
२०१४ मध्ये ‘मोदी सरकार’ केंद्रात स्थानापन्न झाल्यावर आसाराम बापूला तुरुंगात आपण एकटे आहोत असे वाटू नये; यासाठी हरयाणा-हिस्सारचा बाबा रामपाल, उत्तर प्रदेशातला बाबा रामवृक्ष, पंजाबातला बाबा राम रहीम यांचीही तुरुंगात रवानगी झाली. त्यानिमित्ताने ‘मोदी सरकारही हिंदूंच्या विरोधी आहे का?’ अशी चर्चा एका ‘टीव्ही चॅनल’ने ठेवली होती. त्यात अॅड. पुनाळेकर यांच्या बरोबर मीही होतो. पुनाळेकर हे तुरुंगात अटकेत असलेल्या बाबा-बापूंना ‘संत’ म्हणत त्यांची बाजू मांडत होते. ते ‘सनातन’ संस्थेचे प्रवक्ते म्हणून उपस्थित होते. त्याचा उल्लेख करून मी त्यांना विचारलं, ”आध्यात्मिक गुरूंना आणि परमपूज्यांच्या संस्थेला वकिलाची – प्रवक्त्याची गरज का लागते ?”
ह्या प्रश्नाने अॅड. पुनाळेकर हडबडले. त्यांची ती अवस्था बघून म्हणालो, ”भाजप’चे मोदी सरकार ज्या बुवा – बाबा- बापूंची शिडी करून, देशात धार्मिक उन्माद वाढवून सत्तेवर आले; ती शिडी आपल्यासाठी घातक होऊ नये, यासाठी मोडीत काढत आहे. तशीच ’सनातन’चीही गत होईल, ह्या भीतीपोटी पुनाळेकर आपली नाराजी व्यक्त करीत असावेत. अशी नाराजी व्यक्त करण्याऐवजी बहुजन तरुणांचा बुद्धिनाश करणारे तुमचे ‘सनातनी उद्योग थांबवा !”
यातील शेवटच्या वाक्यावर ते अस्वस्थ झाले. कार्यक्रम संपल्यावरही ते मला ‘तसं काही नाही’ असं समजावून सांगत होते. मी त्यांना दाखले देत होतो. ते निरुत्तर होत होते. शेवटी निरोप घेताना म्हणालो, ”तुम्ही वकील-प्रवक्ते आहात. पण आरोपी असल्यासारखे बोलताय !” तेव्हा ते दाभोळकर- पानसरे खून खटल्यात आरोपी होतील, असे वाटले नव्हते. सचिन-शरद हे दाभोलकर हत्येतील आरोपी आहेत, ह्याचा थांग त्यांना अटक होईपर्यंत त्यांच्या घरच्यांना लागला नव्हता. ५-७ वर्षं क्रौर्य दडवून ठेवण्याचा सराईतपणा कसा येतो? हत्येला ‘वध’ म्हटलं की क्रौर्याला धर्मपालनाचा दर्जा मिळतो, असं धर्मांधांचं शास्त्र सांगते. ते आत्मसात केल्याने सचिन-शरदमध्ये दाभोलकरांच्या हत्येचा सल राहिला नसावा.
ह्या दोघांनाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी न्यायालयात ओळखल्याने त्यांना कठोर शिक्षा होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणालेत. पण त्याने काही संभाव्य धोका टळणार नाही. सचिन-शरद यांना दाभोलकर – पानसरे यांच्या हत्या करण्यासाठी तयार करणारे सूत्रधार अजूनही पुढे आलेले नाहीत. ते आणण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला भाग पाडले पाहिजे. कारण हेच सूत्रधार सचिन-शरद यांना शोधून लोकहितार्थ कार्य करणार्यांच्या हत्येचे बेत आखत असतील!
—— 3—–
अब्रूनुकसानीचे सनातन सत्य
संस्थात्मक कार्यात विविध वृत्ती-प्रवृत्तीची माणसं जोडलेली असतात. त्यातल्या कुणी गैरकृत्य केलं म्हणून त्याची जबाबदारी संस्था-संघटनेवर टाकता येत नाही. तथापि, संबंधित संस्थेच्या मुखपत्रातून, ‘गुरु’वाणीतून जे विचार पेरले जातात, अनुयायांच्या मनावर बिंबवले जातात; ते अतिरेकाच्या दिशेने घेऊन जाणारे असतील; अतिरेकीपणाला खतपाणी घालणारे असतील; सामाजिक ऐक्याला- सलोख्याला छेद देणारे असतील; लोकशाही व्यवस्थेच्या व देशाच्या ‘संविधान’च्या विरोधात जाणारे असतील, तर त्याची लोकांना माहिती देण्याचे; त्याची चिकित्सा करण्याचे का टाळायचे?
पत्रकारितेचे हे कर्तव्य ‘चित्रलेखा’ने वेळोवेळी चोखपणे बजावले आहे. म्हणूनच ”हिंदूंनो, नक्षलवादी व दहशतवादी यांचे अनुकरण करायला पर्याय नाही !” ( ‘दै. सनातन प्रभात’- ७ मार्च २००८) यासारखी ‘सनातन संस्था’चे प्रमुख जयंत आठवले यांची विधानं जगजाहीर होऊ शकली. यामुळे चुकीची दुरुस्ती झाली असती तर वाशी, नांदेड, रत्नागिरी येथील बॉम्बस्फोटात हिंदूंचीच तोडमोड झाली नसती आणि या प्रकरणात ‘सनातन’चे कार्यकर्ते सापडल्यामुळे संस्थेची जी बदनामी झाली, तीही झाली नसती. तथापि, ‘चित्रलेखा’ला धडा शिकवण्यासाठी ‘गडकरी – भावे नाट्यगृहा’च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील लेख-रिपोर्टमधून संस्थेची अब्रूनुकसानी झाली म्हणून गोव्याच्या कोर्टात कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आला.
‘न्यायव्यवस्था असत्य दडपण्यासाठी नसते,’ यावर आमचा विश्वास असल्यामुळे आम्ही गेली १४ वर्षे न्यायालयीन लढाई लढतोय. त्यात जय-पराजयाचा हिशेब नाही. क्रौर्याला धर्माआड लपवणारं सनातन सत्य माजू नये, हा अट्टहास मात्र नक्कीच आहे. ह्याच आग्रहाने महाराष्ट्राचे माजी पोलीस महानिरीक्षक एस. एम. मुश्रीफ हे गेली १० वर्षे लेखन- भाषण करीत आहेत. ”हू किल्ड करकरे” आणि ”२६/११ प्रोब : व्हाय ज्युडिशिअरी आॅल्सो फेल्ड” ह्या इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकांनी संबंधित घटनांमधील राजकारण पुराव्यांसह पुढे आणले आहेत.
त्याच मालिकेतील ’Brahminists Bombed, Muslims Hanged’ हे तिसरे इंग्रजीतील पुस्तक ”बॉम्बस्फोट : ब्राह्मण्यवादी दोषी,
मुस्लिमांना फाशी” अशा शीर्षकाने अलीकडेच मराठीत प्रकाशित झालंय. ( सनय प्रकाशन ; पृष्ठ ३१२, किंमत रु.३००, पुस्तकासाठी संपर्क : ९८६०४२९१३४ / ८६२६०८५७३४) ह्या पुस्तकात त्यांनी २००२ पासून देशात आणि महाराष्ट्रात झालेले बॉम्बस्फोट हे रा.स्व.संघ, अभिनव भारत, बजरंग दल, जय वंदे मातरम्, सनातन संस्था इत्यादी ब्राह्मण्यवादी विचारसरणीच्या संघटनांच्या कटाचा भाग कसे होते, याबाबतची सविस्तर माहिती पुराव्यांसह दिली आहे.
मात्र, यापेक्षा अधिक धक्कादायक माहिती पुढीलप्रमाणे आहे. त्यात ‘राज्य गुप्तचर संघटना- IB’, ‘राष्ट्रीय अन्वेषण अभिसरण संस्था- NIA’, ‘दहशतवाद विरोधी पथक-ATS’ या यंत्रणांनी बॉम्बस्फोटातील ब्राह्मण्यवाद्यांना गोत्यात आणणारे धागेदोरे जाणीवपूर्वक कसे लपवले आणि प्रसारमाध्यमांच्या मदतीने बॉम्बस्फोटांचे खापर मुस्लिमांवर कसे फोडले, याविषयीचा तपशील आहे. ”काही खटल्यात प्रसारमाध्यमांच्या प्रचार तंत्राला न्यायालय बळी पडले किंवा न्यायालयाची सरकारी पक्षाकडून दिशाभूल झाली,” असा दावा मुश्रीफ यांनी निष्कर्षात केलाय. त्यातील तथ्ये तपासण्याची जबाबदारी सरकारची आहे; तशीच न्यायालयाचीही आहे. असा विषय उच्च वा सर्वोच्च न्यायालय स्वतःच याचिका म्हणून दाखल करू शकते. ते केले पाहिजे.
एस. एम. मुश्रीफ हे ’IPS रँक’चे अधिकारी आहेत. त्यांनी राज्य पोलीस दलाचे ‘पोलीस महानिरीक्षक’ हे सर्वोच्च पद भूषवले आहेत. त्यांनी देशातल्या दहशतवाद संबंधाने पुढे आणलेल्या माहिती, तपशील, निष्कर्षाला ते ”मुस्लीम’ असल्याने असेच लिहिणार” म्हणत दुर्लक्षणे, हे बॉम्बस्फोटापेक्षा अधिक घातक ठरणारे आहे. ‘गडकरी-भावे नाट्यगृह’ बॉम्बस्फोट संबंधाने ‘चित्रलेखा’ने केलेल्या तपशीलवार रिपोर्ट-लेखाची दखल सरकारी पातळीवर वेळीच घेतली असती ; तर दाभोलकर-पानसरे यांच्या हत्या नक्कीच टाळता आल्या असत्या!
आता दाभोलकर-पानसरेंच्या मारेकर्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली, तरी त्यांचे हकनाक गेलेले जीव परत येणार नाहीत. परंतु, मारेकऱ्यांना तयार करणारा खुनशी विचार आणि त्यांचा सूत्रधार जाहीर झाल्यास शरद- सचिन, वैभव, श्रीकांत, गणेश यांच्यासारखे अनेक तरुण देशविघातक कारस्थानांना बळी पडून आपल्या आयुष्याची माती करून घेणार नाहीत. तसेच, बॉम्बस्फोट व हत्या प्रकरणांत तपास व न्याय यंत्रणेचा प्रचंड वेळ आणि सरकारी तिजोरीतला पैसा खर्च होतो, तो होणार नाही.
”२००२ पासूनच्या बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालांचे न्यायपालिकेने न्यायिक पुनर्विलोकन करावे; शंकास्पद खटल्यांचा- निकालांचा स्वतंत्र व निःपक्षपाती पुनर्तपास करावा; तसे केल्यास या खटल्यांमध्ये ब्राह्मण्यवाद्यांचा सहभाग असल्याचे आणि मुस्लिमांना आधीच दोषी ठरवून शिक्षा सुनावल्याचे उघडकीस येईल,” अशी खात्री एस. एम. मुश्रीम यांनी व्यक्त केलीय. त्याला न्यायपालिका व सरकारने प्रतिसाद दिला पाहिजे. आधीच्या पुस्तकातील उल्लेखाबद्दल ’सनातन’ने मुश्रीफांवर गोवा कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केलाय. दाभोलकर -पानसरे हत्या खटल्यात ‘सनातन’चे साधक-कार्यकर्ते, प्रवक्ते आरोपी झालेत. तरीही नव्या पुस्तकाच्या संदर्भाने ‘सनातन संस्था’तर्फे मुश्रीफ यांच्यावर अब्रूनुकसानीचा नवा दावा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर ‘अब्रू उरली नसताना नुकसान कसे होईल,’ असे विनोद करून जबाबदारी झटकू नये.
पोलीस, प्रशासन, न्यायपालिका, सरकार यांनी मुश्रीफ यांच्या आवाहनाला आव्हान समजून आपणही अब्रूदार असल्याच—————————————-
चित्रलेखा’च्या (अंक दिनांक : ४ एप्रिल २०२२) अंकातील ‘संपादकीय’ आहे.
माहिती-ज्ञानासाठी आपल्या ग्रुपमधील मित्र परिवारास फॉरवर्ड/शेअर करा
———————————————-
■ लेखक : ज्ञानेश महाराव

