काँग्रेसचा मोठा निर्णय! उमेदवारी मागे घेताच शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने शिस्तभंगाविरोधात कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. हा निर्णय महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार घेण्यात आला.
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाला विश्वासात न घेता उमेदवारी मागे घेतल्याने संबंधित पक्षांनी त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे.
काँग्रेसने वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने पक्षात नाराजी निर्माण झाली. त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती.
या मागणीनंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट आदेश जारी केला आणि शैलेश अग्रवाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. काँग्रेसने स्पष्ट संदेश दिला आहे की, पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात किंवा नेतृत्वाला न सांगता घेतलेल्या निर्णयांवर कठोर कारवाई केली जाईल.
याआधीही विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेतल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बाळ माने आणि देवयानी डोणगावकर यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्याच धर्तीवर काँग्रेसनेही शिस्तभंग सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवरही काही अंतर्गत मतभेद असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने घेतलेली ही कठोर कारवाई राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या माघारीमुळे विविध पक्षांमध्ये शिस्तभंगाच्या कारवाया सुरू झाल्या असून, पुढील काही दिवसांत आणखी अशा निर्णयांची शक्यता नाकारता येत नाही




