महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमश.15

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमश.15
महात्मा फुले : साहित्य आणि चळवळ
एकात्मतेतच फुले यांचे मोठेपण सामावलेले आहे. म्हणून “समजले आणि वर्तले। तेचि भाग्यपुरुष जाले” अशा भाग्यपुरुषाच्या मालिकेत त्यांची गणना केली पाहिजे. माळी जातीतील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोतीरावांनी द्रष्टेपणा आणि कर्तृत्व या दोन्ही बावतींत एवढी उंची कशी गाठली हे समजून घेतल्याखेरीज त्यांच्या कार्याची व विचारांची महती आपल्या ध्यानात येणार नाहीत.
विद्यार्थीदशेतील संस्कार
जोतीरावांचा जन्म पुणे येथे इ. स. १८२७ मध्ये झाला. त्यांची घरची स्थिती पुष्कळच चांगली होती. त्यांचे वडील गोविंदराव यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी गावठी मराठी शाळेत घातले. पुढील चार वर्षांत या शाळेतील त्यांचा अभ्यासक्रम पुरा होतो न होतो तोच त्यांच्या शिक्षणक्रमात अचानक खंड पडला; आणि ते आपल्या घरच्या बागेत काम करू लागले. आपल्याकडील जुन्या शहरांची एकंदर रचना पाहिल्यास त्यात वेगवेगळ्या थरांतील लोक वेगवेगळ्या भागांत विभागलेले असत. नित्य आणि नैमित्तिक पण केवळ औपचारिक अशा व्यवहाराखेरीज त्यांचा एकमेकांशी फारसा संबंधच येत नसे. शिवाय प्रत्येक जनसमुहाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध प्रायः आपापल्या जातीपुरते मर्यादित होते. त्या काळच्या पुण्यातील उच्चवर्णियांची वस्ती बहुतांशी तीनचार पेठांतच केंद्रित झालेली होती. बरे, मुलांचे स्नेहीसोबती म्हटले, तर अर्थातच ते आसपासच्या भागातील असणार. तेव्हा फुले यांचे बंद पडलेले शिक्षण पुन्हा सुरू होऊन इ. स. १८४१ मध्ये ते इंग्रजी शाळेत जाऊ लागेपर्यंत तरी उच्चवर्णियांची मुले त्यांच्या सहवासात आली नसल्यास नवल नाही. त्यांच्या आरंभीच्या मित्रपरिवारात काही मुसलमान मुले होती. त्यांच्या तोंडून हिंदुधर्मावरची टीका ऐकून जोतीरावांना त्यातील अन्याय, उच्चनीच भाव आणि धर्माचरणातील मतलबीपणा यांची पहिल्या प्रथम जाणीव झाली; आणि आपल्या धर्मसंस्थेचे अंतरंग न्यायनिष्ठुरतेने तपासून पाहण्याची त्यांना गरज भासू लागली. “मी लहान असताना, माझे आसपासचे शेजारी मुसलमान खेळगडी यांच्या संगतीने मतलबी हिंदुधर्माविषयी व त्यातील जातिभेद वगैरे कित्येक खोट्या मतांविषयी माझ्या मनात खरे विचार येऊ लागले, त्याबद्दल त्यांचे उपकार स्मरतो” असे खुद्द फुले यांनीच नमूद करून ठेवले आहे.




