मंडल नामा क्रमशा भाग 56 चळवळीमुळे सामाजिक बदल

मंडल नामा क्रमशा
भाग 56
चळवळीमुळे सामाजिक बदल
मी मुस्लिम ओबीसींसाठी १९८० पासून कार्यरत आहे. या ४२ वर्षांच्या प्रवासात मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल झाल्याचे मला स्पष्टपणे जाणवते. मी जेव्हा ओबीसी चळवळीत सहभाग घेतला तेव्हा मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. ओबीसी व आता ‘पसमंदा’ म्हणून उल्लेख होत असलेला समूह तेव्हा रोज हातातोंडाची गाठ घालण्यासाठी संघर्ष करत होता. मंडल आयोगाची अंमलबजावणी होण्यापूर्वी निकषपात्र मुस्लिमांनी स्वतःला ‘ओबीसी’ म्हणवून घ्यावे यासाठी मी जीवापाड मेहनत केली. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर त्यांनी ओबीसी प्रमाणपत्र काढून लाभ घ्यावा यासाठी सतत प्रयत्न केले. विरोधाचा सामना केला. पण कधीच टोकाची भूमिका घेतली नाही. विरोधकांसोबत चर्चेचा प्रयत्न केला. सर्व प्रश्न चर्चेतून सुटतात या लोकशाही मूल्यावर माझा विश्वास आहे. महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या अहिंसक मार्गाने आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घेतली. काही जणांना आमची भूमिका पटली, त्यांनी प्रमाणपत्र काढले. त्यांचा लाभ होताना पाहून इतरांनी प्रमाणपत्र काढले. हा प्रवाह वाढत गेला.
काळाच्या ओघात सर्वच ओबीसींचे पारंपरिक व्यवसाय बंद होत आहेत. त्याला मुस्लिमही अपवाद नाहीत. त्यामुळे व्यवसाय बदलणे किंबा शिक्षण घेऊन पांढरपेशा नोकरीत येणे हे दोनच पर्याय आहेत. ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यामुळे मुस्लिमांत शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील तीस वर्षांत
ओबीसी मुस्लिमांच्या सामाजिक परिस्थितीत फरक पडला. अनेक जण डॉक्टर, इंजिनीयर, शासकीय अधिकारी, शिक्षक, शासकीय कर्मचारी, महामंडळांचे कर्मचारी झाले. केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पास होऊन अनेकांनी ओबीसी प्रवर्गातून मानाच्या सनदी नोकऱ्या मिळवल्या. न्यायाधीशही झाले. या यशस्वी तरुणांच्या कुटुंबाची आर्थिक प्रगती झाली आहे. शिकल्याशिवाय तरणोपाय नाही, हे मुसलमानांना पटले आहे. विशेषतः मुस्लिम मुलींचा शिक्षण घेण्याकडे जास्त ओढा आहे. आता मुस्लिम पुरुषही घरातील मुलींनी उच्चशिक्षण घ्यावे, असा आग्रह धरत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांत ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाले. त्यामुळे कित्येकांनी महापौर, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सहकार क्षेत्रातील राजकीय पदे मिळवली. त्यांचा मानसन्मान वाढला व ते मुख्य राजकीय प्रवाहात आले.
आर्थिक परिस्थिती सुधारल्याने अनेक मुस्लिम ओबीसींचा सामाजिक दर्जाही उंचावला आहे. पूर्वी मेहतराला शेजारी बसवून घेत नसत. आता सुशिक्षित मेहतराला मुलगी देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पूर्वी फक्त आपापल्या बिरादरीतच लग्न लावले जात होते. ओबीसी, भटके व निम्न सामाजिक स्तरातील मुस्लिम कुटुंबे शिक्षण व ओबीसी प्रवर्गाच्या लाभामुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न होत आहेत. त्यांना सर्वांकडून सहज स्वीकारले जात आहे. हा मोठा सामाजिक बदल आहे. त्याला मी एकटाच कारणीभूत ठरलो, असा माझा दावा नाही. मी नसतो तर दुसऱ्याने मुस्लिम ओबीसी चळवळ केली असती. धर्मवाद्यांनी कोंबडा झाकून ठेवला म्हणून सूर्य उगवायचा राहिला नसता. पण भारतीय संविधानामुळे हा बदल वेगात झाला. तो मला ४२ वर्षांच्या वाटचालीत स्पष्टपणे जाणवतो. मुस्लिमांमधील या सामाजिक बदलाचा समाजशास्रीय अभ्यास होण्याची गरज आहे.
मंडलनामा |
शिव क्रांती टीव्ही दिनबंधन संपादक सत्यशोधक शंकर राव लिंगे 73 87 37 78 शून्य हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा बेल दावा

