जेधे जवळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेली सत्यशोधक चळवळ ताब्यात घेतली आणि खुशाल काँग्रेसमध्ये विलीन करून स्वजातीचा उद्धार केला

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴जेधे जवळकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेली सत्यशोधक चळवळ ताब्यात घेतली आणि खुशाल काँग्रेसमध्ये विलीन करून स्वजातीचा उद्धार केला त्यांच्या घराजवळच राहत असलेले महात्मा ज्योतिराव फुले यांची सून राधाबाई उर्फ चंद्रभागा यशवंत फुले यांच्यासाठी त्यांनी काय केलं?🔴🟡🟠🟡🟡🟡
👇👇👇👇
🔥वादळाचे वंशज🔥
👉संशोधक..- डॉ. बाबा आढाव👈
महात्मा जोतीराव फुले यांचे सामाजिक क्रांतिकार्य अतुलनीय आहे. केवळ दयाभावनेने प्रेरित होऊन त्यांनी कोठलीही कृती केलेली नाही; तर प्रत्येक कृतीमागचा क्रांतिकारक विचार त्यांनी स्पष्ट केलेला आहे. सामाजिक सुधारणेच्या चळवळीत क्रांतिकारक विचार बोलणारे व लिहिणारे अनेक जण आहेत. परंतु क्रांतिकारक मूल्य व्यक्तिगत जीवनात स्वीकारणारे फुले हे पहिलेच महामानव.
त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांनी जोतीरावांच्या अंगीकृत कार्यात सर्वार्थाने सहभाग घेतला. त्यांनी शैक्षणिक व इतर सामाजिक कार्यांबरोबरच बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापले व परित्यक्तांच्या बाळंतपणाची सोय केली. खुद्द सावित्रीबाईंनीच काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेचे बाळंतपण केले व तिच्याच पोटी जन्मलेल्या मुलाला फुले दांपत्याने दत्तक घेतले; त्याचे नाव यशवंत. जन्माधिष्ठित जाति-व्यवस्था व चातुर्वर्थ्याच्या गुलामगिरीला सुरुंग लावून या मुलाचे बारसे झाले.
यशवंताचे लालनपालन सावित्रीबाईंनी केले. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर हा मुलगा डॉक्टर झाला. जोतीरावांचे माळी समाजातील स्नेही ग्यानोबा कृष्णाजी ससाणे यांची मुलगी राधा हिच्याबरोबर यशवंताचा विवाह झाला. (४ फेब्रुवारी १८८९ रोजी). त्या वेळच्या माळी समाजाला हे कृत्य अजिबात पसंत पडलेले नाही. इतकेच नव्हे, तर यशवंतासारख्याला दत्तक घेण्यासही नातेवाईकांनी विरोध केला. जोतीरावांनी १८ जुलै, १८८७ रोजी आपले मृत्यूपत्र रजिस्टर केले. त्यातील मजकुरावरून ही बाब लक्षात येते. १८९० साली जोतीराव निवर्तले. मृत्यूपत्रात सत्यशोधक चळवळ पुढे चालवण्याची जबाबदारी यशवंतावर घातलेली आहे व ते त्यांनी केले नाही तर दत्तक बदलण्याचा अधिकार सावित्रीबाईंना, देण्यात आलेला आहे. ‘श्रीमती सावित्रीबाई फुले १८९७ सालच्या प्लेगच्या साथीत दगावल्या,’ असे विधान धनंजय कीरांनी लिहिलेल्या फुले चरित्रात सापडते. डॉ. यशवंतराव १९०९ साली वारले. उरल्या डॉ. यशवंतरावांच्या पत्नी राधाबाई! ही विधवा कोठे गेली?
काळाच्या पोटात कोठे विसावली असेल? जोतीरावांच्या साऱ्या तपश्चर्येचेप्रायश्चित या अभागिनीच्या वाट्याला आलेले दिसते. यशवंतरावांच्या मृत्यूची नक्की तारीख अद्यापी उपलब्ध होऊ शकलेली नाही, मात्र मरणापूर्वी ते नगरला व पुण्याला डॉक्टरी व्यवसाय करित, अशी माहिती मिळाली आहे. जोतीराव व सावित्रीबाई वारल्यानंतर गंज पेठेतील त्यांचे घर डॉ. यशवंतराव व राधाबाई यांना मिळाले. जोतीरावांनी मृत्यूपत्र मुद्दामच करून ठेवले होते. कारण, औरस संतती नाही, या सबबीखातर नातेवाईक मंडळी कोर्टकज्जे करतील व दत्तक यशवंताला त्रास देतील, असा त्यांचा अंदाज असावा, जोतीरावांचा अंदाज पुढे खराच ठरलेला आहे. जोतीरावांच्या राहत्या घराचे कागदपत्र उपलब्ध आहेत. मामलेदार कचेरीतील घरांच्या रेकॉर्डवर १८९४ पासून १९०७ पर्यंत यशवंतराव जोतीराव फुले असे नाव आढळते. १९०९-१० सालात चंद्रभागाबाई यशवंतराव फुले अशी नोंद आहे. १९१२-१३ सालापासून मारुती कृष्णाजी देडगे यांचे नाव आढळते; व पुढे १९२३-२४ सालात सेक्रेटरी “माळी फ्री बोर्डिंग “श्री. नारायण सखाराम यांच्या नावे नोंद झालेली आहे!
डॉ. यशवंतराव फुले वारले, त्या वेळी त्यांना एक मुलगी होती. या मुलीचे नाव सोनी ऊर्फ लक्ष्मी. जोतीरावांच्या सुनेबद्दल चंद्राभागाबाईच्या-बद्दल माहिती गोळा करण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. जोतीरावांच्या घराभोवती अनेक म्हाताऱ्या मंडळींच्या मुलाखती घेतल्या. पुरुषांनी चक्क कानांवर हात ठेवले! पुण्यातील माळी पुढाऱ्यांच्या गाठी घेतल्या. सत्यशोधक चळवळीतील जुन्या नेत्यांना विचारले. परंतु कोणी काहीच सांगेना. हडपसरला मी बारा वर्षे वैद्यकीचा व्यवसाय केला. जोतीरावांचे व्याही ग्यानबा कृष्णाजी ससाणे हडपसरचे. त्यांच्या हल्लीच्या वंशजांना विचारले, जोतीरावांनी ससाण्यांच्या मदतीने हडपसरला शाळा सुरू केली होती. त्यामुळे या ससाण्यांना ‘साळंवाले ससाणे’ या नावाने ओळखतात. त्यांचे एक घराणे कोपरगाव भागात गेलेले आहे. यातील कोणीही राधाबाईंच्याबद्दल सांगू शकेना. हडपसरला असताना एका म्हातारीने मात्र सांगितले, “चंद्रभागा बिनवारशी मेली,
म्हणतात कुठे सोमेश्वराच्या की, रामेश्वराच्या दारात!” बाईंच्यावर माळी समाजाने व नातेवाईकांनी (माहेरच्या- सासरच्या) बहिष्कार घातला होता. ब्राह्मण बाईच्या पोटी जन्मलेला हिचा नवरा ! कडू बेणे!! त्यांना कोण जवळ करणार ? यशवंतराव १९०५ ते ०९ पर्यंतच्या कालात कधीतरी निवर्तले असावेत. (सत्यशोधक चळवळीचे मराठाकरण याच काळात झाले. जोतीरावांचे सहकारी डॉ. विश्राम रामजी घोले व रा. ब. नारायणराव लोखंडे यांच्यासारखे मित्रही दिवंगत झालेले. कृष्णराव भालेकर विदर्भाकडे गेले. बाईंची एकुलती एक कन्या व त्या ३७७, गंज पेठ येथे रहात होत्या. जोतीरावांच्या घराचा काही भाग वडिलोपार्जित, तर काही भाग त्यांनी नव्याने बांधलेला. तिन्ही बाजूंनी फुल्यांचीच घरे होती. दिनांक २८-१०-१९१० रोजी राधाबाई ऊर्फ चंद्रभागाबाईनी ही वास्तू अवघ्या १०० रुपयांस मारुती कृष्णाजी देडगे यांना विकली. खरेदीखत लिहून देताना बाईनी त्यावर स्वतःची सही केलेली आहे. यावरून त्या साक्षर होत्या, हे स्पष्ट होते. जोतीराव व पुढे यशवंतराव फुले यांची नावे गंज ४०५-३९५ गंज या दोन्ही सलग वास्तूंवर, मालक म्हणून लागलेली आहेत. या दोन्ही वास्तूंना पुढे ३९४ व ३७७ हे नंबर पडलेले आहेत. हल्ली मात्र ४०८ महात्मा फुले पेठ हा एकच नंबर आहे.
चंद्रभागाबाईंना जवळच्या नातेवाईकांची ताटातूट, कौटुंबिक सामाजिक बहिष्कार, इस्टेटीचे वाद, अकाली वैधव्य या साऱ्या प्रकारांना तोंड द्यावे लागले. २८-२९ व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेले. नातेवाईक असूनही सर्वांचा असहकार, ‘कडूवंशावळ’ म्हणून एकुलत्या एका अपत्याची अवहेलना, ख्रिस्ताळलेले घर म्हणून अपप्रचार-एक ना अनेक संकटे वाट्याला आलेली. माळी समाजाने ‘बाईंच्या बरोबर जोतीरावांच्या निकटच्या भाऊबंदांवर बहिष्कार घातलेला होता. १९२३-२४ सालात तो उठवण्यात आला. तो समारंभ म्हणजे एक स्वतंत्र विषय आहे. बहिष्कार फक्त भाऊबंदांवरचा उठवला. चंद्रभागाबाई व त्यांची कन्या लक्ष्मी यांच्यावर कायमच राहिला. फुलमाळी समाजातील प्रत्येक कुटुंबातील वंशावळ नातेपुत्याचे बाबूराव पांडुरंग शिंदे यांच्याकडे लिहिली जाते. त्यांच्याकडे पत्रे पाठवून विचारणा केली. यशवंतरावांचे नाव माळगंडांच्या यादीत कसे आढळणार? शेवटी जोतीरावांच्या घराभोवती मुलाखती घेत असताना (श्री. पीतांबर गजानन फुले यांनी कोर्ट-खटल्यातील निकालाचा एक कागद दाखवला. ते प्रकरण १९११ सालातले आहे. त्यावरून पुणे जिल्हा कोर्टातून जुनी कागदपत्रे हुडकून काडली.
त्यावर पुढील आशयाचा मजकूर आढळला :-
श्री गजानन गणपतराव फुले यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टात १७-७-१९११ रोजी अर्ज करून अज्ञानाचे पालकत्व मिळण्याची मागणी केलेली आहे. जोतीरावांचे सख्खे बंधू राजाराम त्यांचे चिरंजीव गणपतराव, गणपतरावांचे चिरंजीव गजानन गणपतराव फुले, अर्जात पुढील विधाने आहेत :
१) अज्ञान लक्ष्मी ऊर्फ सोनी बापाचे नाव यशवंतराव जोतीराव फुले हिची नक्की जन्मतारीख (अंदाजे) उमर वर्षे ६, धर्म हिंदू.
२)अज्ञान, ही मुलगी असून अविवाहित आहे.
३) अज्ञानाची मिळकत खाली लिहिल्याप्रमाणे आहे :
रु. १,००० न्यूयॉर्क लाईफ इन्शूअरन्स कंपनीमध्ये बापाचे पॉलिसीचे आहेत.
रु. १,५०० स्थावर मिळकत घरे वगैरे. रु. १,००० दागिने, भांडीकुंडी वगैरे.
रु. ८०० पोस्टातील. अज्ञान हिची आई चंद्रभागा हिने काढले, ते.
४) अज्ञान ही आपली आई चंद्रभागा इजपाशी राहात असून चंद्रभागा हिने हल्ली मोहतर लावला असून तिचे नाव चंद्रभागा कोम मारुती माने असे आहे. तिने अज्ञानाच्या घरांपैकी काही घरे बिगरहक्काने विकली आहेत. अज्ञानाचे दागिने वगैरे विकृत अज्ञानाच्या इस्टेटीची अफरातफर करत आहे. यामुळे अज्ञानाचे नुकसान होत आहे.
५) [१] अज्ञानीचे जवळचे नातलग चंद्रभागा कोम मारुती माने रा. पुणे, पेठ सोमवार, घर नं. ४१०, बहिरू धायरकरांच्या वाड्यात,
[२] पिरताबाई कोम गणपतराव फुले, अज्ञानाची चुलती, राहणार पुणे, पेठ जुना गंज घर नंबर ३८७.
६) अज्ञानाची आई मोहतर लावून गेली आहे; व ती अज्ञानाच्या मिळकतीची अफरातफर करत आहे व तिचा आता अज्ञानाच्या हितामध्ये हितसंबंध राहिला नाही व अर्जदार हा अज्ञानाचा चुलत भाऊ आहे. व त्याचा अज्ञानाच्या हिताविरूध्द हितसंबंध नाही.
७) अज्ञानाचे, शरीराचे व इस्टेटीचे पालन करण्यासाठी कोणाची नेमणूक झाली नाही. अथवा पालन करण्याचे सर्टिफिकेट मिळण्यासाठी कोणीही अर्ज केला नाही.
अज्ञानाच्या इस्टेटीचे संरक्षण व अज्ञानाचे पालनपोषन करण्याकरता अर्जदार या मिळकतीचे पालन करणार नेमावे; व याची आई पिरताबाई गणपतराव फुले इजला अज्ञानाचे शरीराचे पालन करणार नेमावे.
*कोर्टात ॲफिडेव्हिटशिवाय अन्य कोठलाही पुरावा आलेला नाही. इतकेच नव्हे, तर चंद्रभागाबाईंना समन्स मिळाल्याचीही नोंद नाही. अगदी एकतर्फी निर्णय झालेला आहे. (दि. २-९-१९११ रोजी)*
*या अर्जावरून दोन-तीन गोष्टी स्पष्ट होतात (जोतीरावांना इंग्रज सरकारकडून पैसा मिळत असे, अशी एक कुजबुज नेहमी चालते. जोतीरावांचे मृत्यूपत्र व वरील अर्ज यावरून खरी वस्तुस्थिती स्पष्ट होते. या आक्षेपाला वेगळे उत्तर देण्याची गरज उरत नाही. जोतीरावांचे मृत्यूपत्र रजिस्टर केलेले आहे. डॉ. विश्राम रामजी घोले यांनी डॉक्टर म्हणून त्यावर सही केलेली आहे. या अर्जावरून डॉ. यशवंतरावांच्या मृत्यूचा काळ व मुलीचा जन्म या बाबी नक्की होतात. प्रश्न उरतो चंद्रभागाबाईच्या मोहतरावद्दल मला ही बाव बरी वाटत नाही. कारण गंज पेठेतील घर सोडल्यानंतर, बाई धायरकरांच्या वाड्यात राहायला गेलेल्या नाहीत. त्या राहत होत्या १३०३, शुक्रवार पेठ, पुणे येथे नाईकांच्या रामेश्वर मंदिराच्या अगदी मागच्या बाजूस. ही माहिती मला श्रीमती माणकाबाई दशरथ शिंदे (वय ८५ वर्षे) व* *_श्रीमती सोनाबाई कृष्णाजी फुले (वय वर्षे ७०) (प्रसिध्द कलावंत निळू फुले यांच्या मातोश्री)_* *यांच्याकडून* *मिळाली, त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या.
निळू फुले यांचे सहकारी चंद्रकांत बोराटे व पुणे महानगरपालिकेचे सदस्य मधु निरफराके यांनी वाटा दाखवत्याः यातूनच चंद्रभागाबाई फुले व त्यांची कन्या लक्ष्मी ऊर्फ सोनी यांच्या जीवनाची पुढची वाटचाल समजली. चंद्रभागाबाईंच्या मोहतराबाबत गजानन फुले यांनी केलेली विधाने खोटी असावीत. सावित्रीबाई फुले यांच्या चरित्र लेखिका सौ. फूलवंताबाई झोडगे यांनी सोमवार पेठेतील धायरकरांच्या वाड्यात जाऊन अनेक ठिकाणी चौकशी केली. मीही १३०३ शुक्रवार पेठ या पत्त्यावर बाईच्या मृत्यूची नोंद शोधण्याचे काम अंगीकारले. श्रीमती माणकाबाई शिंदे यांनी सांगितले, जोतीराव फुल्यांची नात आमचा भाऊ, गंगाराम होले यांच्या मुलास- (बाबूला) केली होती. यशवंतरावांची ती मुलगी. भाऊ , होले यांचे मंडईत हलवायाचे दुकान होते व त्यांचे खडक माळ आळी भागातच घर होते. भाऊ होले यांचा मिश्रजातीय विवाह झालेला होता. त्यामुळे सारख्याला वारखे जमून गेले. लक्ष्मी देखणी होती, डॉ. यशवंतरावांसारखे तिचे रूप होते. परंतु तिची अंगकाठी अशक्त होती. तिची आई चंद्रभागा लेकीजवळच असायची, पण तिच्याबद्दल माणसे वाईटसाईट बोलायची. *तेव्हा तिला वेगळी ठेवली होती. काही तरी कामधंदा करून ती पोट भरायची* होले यांचाही तिला आधार होता *या लक्ष्मीला दोन अपत्ये झाली.*
*१) दत्तात्रय बाबूराव होले) (४५ वर्षे), व*
*२)मथुरा (४३ वर्षे).*
(लक्ष्मी १९३८ सालात वारली, व तत्पूर्वी १९३०-३१ च्या सुमारास चंद्रभागा ऊर्फ राधाबाई वारल्या, होले यांचे कुटुंब त्या काळी ८८८ शुक्रवार पेठ, येथे राहात होते)
श्री. दत्तात्रय बाबुराव होले सध्या ८३१, दत्तवाडी, पुणे येथे राहतात. ते किर्लोस्कर कमिन्समध्ये नोकरीस आहेत. त्यांना ५ मुले आहेत. त्यांच्या भगिनी सी. मथुरा मुंढव्याच्या कोद्रे घराण्यात दिलेल्या आहेत. दत्तात्रय होले यांना बरोबर घेऊन त्या साऱ्या आठवणींची ठिकाणे पाहिली. *त्यांना त्यांच्या आईची आई (चंद्रभागा) आठवते. त्यांनीच १३०३, शुक्रवार पेठ ही जागा दाखवली. आजी गेल्यानंतर तिला आंघोळ घालण्यासाठी स्वतःला वडिलांच्या आईने नेल्याची त्यांना आठवण आहे. आजीकडून मिळालेला जोतीराव फुले यांचा घराण्यातील एक तांब्या-पितळेचा गडवा या साऱ्या आठवणींची साक्ष देतो.*
*साऱ्यांनीच बहिकृत केलेली चंद्रभागा……….अगदी सत्यशोधक चळवळीच्या नेत्यांकडूनही ……..!!!!!! काळाच्या पोटात विसावली आहे-रामेश्वराच्या दारात बेवारशी म्हणून ……….!!!!!!*
*_👆१९२४-२५ सालात सत्यशोधक चळवळ पुणे शहरात शिगेला पोचली होती. त्या वेळेचे नेते “श्री. केशवराव जेधे” व “दिनकरराव जवळकर” यांची घरे चंद्रभागाबाईच्या घरापासून हाकेच्या अंतरावर होती,👆*
*_छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली मुलगी फलटणच्या बजाजी निंबाळकरांना दिली होती. बजाजी मुसलमान झाले होते. त्यांना परत हिंदू धर्मात घेऊन महाराजांनी हा विवाह घडवला. बजाजीचा वंशवेल आहे का? अशी पृच्छा मी फलटणला सध्याचे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे केली होती. त्यांनी तो वंश पुढे न वाढल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्यातील ‘अंग झटकणे’ मला जाणवले. शिवाजीराजांच्या कन्येचे काय झाले, ते इतिहासाच्या वाचनात आलेले नाही. रामदासांनी ‘शुभमंगल सावधान’ असे ऐकताच अंतरपाटापासून पलायन केले. रामदास पुढे संतपदाला पोचले; परंतु त्यांच्यासमोर उभी राहिलेली वधू- तिचे पुढे काय झाले? मला अद्याप तरी समजले नाही. छत्रपती शिवाजी, रामदास, महात्मा फुले यांची नावे अजरामर झालीत; परंतु वर उल्लेखिलेल्या अभागिनी काळाच्या पोटात विसावल्या आहेत-प्रायश्चित्त म्हणून!*
_
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिवक्रांती टीव्ही न्यूज
संपादक
सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१
🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




