
🌸 भक्तीमय वातावरणात संपन्न चंदन उटी उत्सव 🌸 1
|| जय सावता महाराज ||
संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) येथे १४ एप्रिल २०२६ रोजी दरवर्षीप्रमाणे ग्रीष्म ऋतूतील चंदन उटी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यात वारकरी संप्रदायातील भाविकांनी पारंपरिक पद्धतीने चंदन घासून समाधीला लेप लावला. ही परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू असून भक्ती, श्रद्धा आणि समर्पण याचे जिवंत प्रतीक आहे.
या वर्षी संत शिरोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्कार ह.भ.प. गु. ज्ञानेश्वर महाराज कदम (वारकरी भूषण, छोटे माऊली) आणि मा. श्री. सुनीलजी फुलारी (विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र) यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे साहेब प्रमुख उपस्थित होते. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्र विकासाबाबत मोठी घोषणा करत अरण तीर्थक्षेत्रासाठी ८९ कोटींचा आराखडा मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देत विकासकामे वेगाने पूर्ण केली जातील, अशी ग्वाही दिली.
मंत्री गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सावता महाराजांच्या चौकात आल्यानंतर राजकारण होऊ नये; येथे फक्त विकास आणि भक्ती हाच उद्देश असावा.” मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या व्यवस्थापनात आणि सन्मान वितरणात एकतर्फी राजकीय छटा दिसून आली.
👉 अनेक वर्षे आंदोलन करून तीर्थक्षेत्रासाठी लढा देणाऱ्या संघटनांचा नामोल्लेख टाळण्यात आला.
👉 काही कार्यकर्ते व संघटनांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची भावना उपस्थितांमध्ये दिसून आली.
👉 स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही वंशजांची अनुपस्थितीही प्रकर्षाने जाणवली. निमंत्रित पाहुण्यांपैकी मंत्री छगनराव भुजबळ, मंत्री अतुल सावे आणि आमदार योगेश टिळेकर अनुपस्थित होते.
यामुळे “राजकारण नाही” असे सांगितले गेले असले तरी प्रत्यक्षात कार्यक्रमावर एका विशिष्ट गटाचे वर्चस्व असल्याचे चित्र दिसून आले.
कार्यक्रमात प्रभू घाडगे, ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज आणि सुनीलजी फुलारी यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अकलूज नगरपरिषदेच्या सदस्या स्मिता एकतपुरे यांनी केले.
संत सावता महाराजांच्या वंशज मंडळी व संत-महंतांच्या शुभाशीर्वादाने हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. मात्र व्यवस्थापनातील पक्षपातीपणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या कार्यक्रमास अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद (सोलापूर जिल्हा) अध्यक्ष बापूसाहेब भगवान भंडारे व त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय माळी महासंघ, महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी महासंघ, सावता परिषद आदी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माळी समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याचे चित्र दिसून आले. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावता महाराजांचे भक्तगणही आवर्जून उपस्थित होते.
📢 सोशल मीडिया सूचना
बंधूंनो, ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा.
📱 संपर्क: 73 87 37 78 01
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!



















