🌸 ” जोतिबाची सावली … सावित्री माऊली ” या नाटकाचे निमित्ताने …🌸

🌸 ” जोतिबाची सावली … सावित्री माऊली ”
या नाटकाचे निमित्ताने …🌸
दीडशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्याअचलपूरच्या नाट्यक्षेत्रात आता नाटय लेखिका , दिग्दर्शक सौ .अपूर्वा सोनार यांच्या ” जोतिबाची सावली … सावित्री माऊली ” या दोन अंकी नाटकाची भर पडली आहे . त्यांचे पुनरागमन येथील नाटय चळवळीला उभारी देणारे ठरणार आहे .
फुले दाम्पत्यांच्या जीवनातील संघर्ष व त्यांनी केलेल्या सत्यशोधकीय कार्याचे नाटय रुपांतर हा या नाटकाचा गाभाभूत विषय आहे . या नाटकाचा आरंभ अपूर्वा सोनार यांनी ” ब्राहण मित्राच्या भावाच्या लग्नवरातीत “जोतिरावांचा झालेल्या अपमान प्रसंगापासून केला आहे . त्यानंतर फुले दाम्पत्यांनी सुरू केलेल्या शाळा व त्यातील अडचणी , सावित्रीमाईंनी शिक्षिका म्हणून शाळेत शिकवायला जाण्याचा घेतलेला ‘क्रांतिकारी निर्णय ‘, ‘ गरीब स्त्री प्रसंग ‘, ‘ फुलेंच्या पुर्नविवाहाचा प्रसंग ‘, ‘जोतिराव व सावित्रीमाई यांचा ‘ घर सोडण्याचा प्रसंग ‘, ‘ जोतिरावांना मारायला आलेले मारेकरी ‘, ‘ जीव घायला निघालेली गरोदर काशीबाई ‘, ‘ केशवपनाच्या विरूध्द सावित्रीमाईंनी घडविलेला ‘ नाभिकांचा संप ‘ यासारखे प्रसंग डोळयांपुढे येता येताच हे नाटक फुले दाम्पत्यांच्या जीवनातील ‘ यशवंताला दत्तक ‘ घेण्याच्या भावनिक प्रसंगाकडे हळूहळू सरकत जाते . या सर्व प्रसंगांना लेखिका अपूर्वा सोनार यांनी आपल्या कसदार लेखनातून करवलेला जिवंततेचा परीस्पर्श या नाटकाच्या वाचकांना प्रसंगानुरूप जाणवतो .
क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या सामाजिक बंडावर आधारलेलं ‘ जोतिबाची सावली … सावित्री माऊली ‘ हे नाटक स्त्रीप्रधान नाटयकृती आहे . याचे कारण म्हणजे जोतिरावांच्या प्रत्येक क्रांतिकारी निर्णयाची अंमलबजावणी ही सावित्रीमाईंनी स्वतः प्रत्यक्ष कृतीतून केलेली हे नाटक वाचतांना वाचकांच्या लक्षात येते . सावित्रीमाईंनी ज्याप्रमाणे आपल्या घरातच ‘ बालसंगोपन केंद्र ‘ सुरू केले, त्याचप्रमाणे त्या अस्पृश्यांसाठी आपल्या घरातीत ‘ पाण्याची विहीरही ‘ मोकळी करतांना दिसतात . पाण्याच्या संघर्षाला रुपांतरीत करतांना लेखिकेने लिहिलेले पुढील संवाद … ‘ पाणी हे निसर्गाची देण आहे …
बाकी कुणी नसतिल देत त्यांना पाणी !पण … आपण आपल्या घरची विहीर त्यांच्यासाठी खुली करून देऊ ! ‘हे एका स्त्रीने अठराव्या शतकात केलेले मोठेच धाडस म्हणावे लागेल. या नाटकातील प्रत्येक प्रसंगातून विचार व मनानेही प्रचंड खंबीर अशा सावित्रीमाईंची व्यक्तीरेखा आपल्या दृष्टीस सातत्याने पडत राहते . त्यामुळे या नाटकातील प्रत्येक प्रसंगातून सावित्रीमाईंनी तत्कालीन व्यवस्थेविरुध्द केलेली बंडखोरी आपणांस प्रकर्षाने जाणवत राहते .
‘ जोतिबाची सावली … सावित्री माऊली ‘ या नाटकाचा शेवट फुल्यांचे शेवटचे आजारपण आणि त्यातच झालेल्या त्यांच्या निर्वाणाने होतांना दिसतो . आजारणाच्या प्रसंगात त्या दोघांचा लिहिलेला संवाद वाचतांना डोळयांच्या कडा आपसूकच ओल्या होतात . हा करुण प्रसंग रेखाटतांना सौ . सोनार लिहितात …
” हे बघा, मी काय सांगतो ते अगदी लक्ष देवून ऐका…. आजवर आपण जी कार्य केलीत ती अशीच पुढेही चालू ठेवा. आपल्याला इंग्रजांनी खूप मदत केली. तशीच ते पुढेही करत राहतील. माझी शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. जोपर्यंत ही आंग्लाई आहे तोवर सर्व शुद्रातिशुद्रांना शिक्षित करा .
बंधूनो … शिक्षा, ही मनुष्यत्व प्राप्त करून देते. आजवर पेशवाईत जस चालल तस न चालू देता सर्वांना शिक्षण दया. त्यांना माणसात आणा. गाईप्रमाणे कसायापुढे मान देवू नका. समजल नं. आपल्याला आता भलेही यश नसेल… पण येत्या काळात याचे फळ निश्चित मिळेल. आपण आपले कार्य चालूच ठेवायचे आहे. वाघाप्रमाणे जगायला शिका. सावित्रीने आमच्यासोबत अगदी खांद्याला खांदा लावून कार्य केले आहे . आणि हे सर्व त्यांच्यामुळेच शक्य झाले . त्या नसत्या तर हा जोतिबाही नसता . यापुढे त्याच तुमच्या आई आहे .”
फुल्यांच्या निर्वाणानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारात बाधा टाकणाऱ्या भाऊबंदकीला व तत्कालीन परंपरेला छेद देत सावित्रीमाईंनी स्वतःच्या हातात धरलेली तिरडी आणि त्यातच होणारा नाटकाचा शेवट हा तत्कालीक सामाजिक रुढी व परंपरेविषयी आत्यंतिक चिड आणणारा आहे . माणसाच्या मरणाने वैर संपते असे म्हटल्या जाते .परंतु जोतिबांना मात्र मरणानंरही समाजाने त्रास दिल्याच्या प्रसंगाचेवेळी सावित्रीमाईंचे जे बोलणे आहे … ते पाषाणाला पाझर पोडणारे आहे .
त्यावेळच्या त्यांच्या दीर्घ संवादातच फुल्यांची सत्यशोधक चळवळ , त्यांनी केलेली बांधकामे , त्यांना लोकांनी दिलेली ‘ महात्मा पदवी ‘ यासारख्या फुलेंच्या जीवनातील सगळ्याच घटनांचा आढावा सौ . सोनार यांनी विद्रोही व क्रांतिप्रवण शब्दांतून घेतलेला दिसून येतो .
सौ .अपूर्वा सोनार ह्या गेल्या एकोणवीस वर्षांपासून ‘ मी सावित्रीबाई बोलते ‘ या एकपात्री नाटय प्रयोगाचे सादरीकरण करताहेत .आजवर त्यांनी ९९७ पेक्षा अधिक प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सादर केले आहे . त्याशिवाय त्यांनी १ . ज्योतिबांची सावली… सावित्री माऊली ,
२. बंध रेशमांचे ,३. घरात राम अन् बाहेर शाम , ४. माझ काय चुकलं. या नाटकाचे लेखन केले आहे .
प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीच्या नाट्यकर्मी असलेल्या सौ .सोनार यांनी लिखाणासोबतच नाटयाभिनय करतांना आजवर वेगवेगळ्या सोळा नाटकांमध्ये नायिकेच्या मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. त्यातील अनेक भूमिका अजरामरही ठरल्या आहेत. याशिवाय त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे .
सुप्रसिद्ध कवी सुधाकर गायधनी लिखित ‘रायबाई भुलाबाई , ग्रीष्मदाह, वाट्टेल ते प्रेमासाठी, ज्योतिबाची सावली… सावित्री माऊली ‘ यासारख्या नाटकाची निर्मिती करतांनाच त्यांनी त्या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही अभिनयाइतकीच समर्थपणे पार पाडली आहे . यवतमाळात असताना त्यांनी ‘ ज्योतीवाणी ‘ या सांगीतिक ध्वनीफीतीची निर्मिती करून त्यातील गाणी स्वतः गायीली आहेत . महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या सत्यशोधकीय विवाहविधी पध्दतीतील मंगलाष्टकांचे स्वतः गायन करून फुलेंचे विचार सर्वधर्मीयांपर्यंत पोहचविण्याचे मोठे काम त्यांनी हाती घेतले आहे .
या नाटकाचा पहिला प्रयोग सत्यशोधक समाजाचा स्थापना दिवशी येत्या २४ सप्टेबर रोजी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या छत्रपती संभाजी नगरात होत आहे . त्यानंतर सबंध राज्यभरात या नाटकाचे प्रयोग होणार आहे . यात परतवाड़ा शहरातील जेष्ठ रंगकर्मी व नाटयलेखक अशोक बोंडे, कैलाशदादा पेंढारकर,अपूर्वा सोनार ( सावित्रीमाई )मी स्वतः ( जोतिबा ) ,मनोज छापानी , प्रथमेश धोटे , शीला चर्जन , सचिन करडे , अनुराधा भुस्कट ,दिनकर पवार सह एकूण १७ कलावंत व समयोचित भूमिका करणार आहे . या नाटकाची तालीम जोरात सुरु असून लवकरच हे नाटक जुन्या शहरातही दाखविले जाणार आहे .
या तालीमीच्या निमित्ताने प्रत्येक कलावंतास दिग्दर्शिका म्हणून सौ . सोनार वेळोवेळी काही सूचना करत असतात .संवादाचे उच्चारण, शब्दांची फेक , आवाजातील चढउतार ,चेहऱ्यावरी भाव , डोळयांची हालचाल , हातापायांची हालचाल यांसारख्या बारीकसारीक निरिक्षणातून त्यांच्यातील कसलेली दिग्दर्शक व कलावंत मला दिसून आला. ” जोतिबाची सावली … सावित्री माऊली ” हे दोन अंकी नाटक आता पुस्तक स्वरूपात नाट्यरसिक व वाचकांच्या हाती येत आहे . परतवाड्यातील आघाडीची प्रकाशन संस्था असलेले ‘ अनघादित्य ‘ प्रकाशन हे नाटक प्रकाशित करत आहे .
अभिनय , गायन , काव्य,नाट्यलेखन व नाटयदिग्दर्शन या सर्वच कलाप्रांतात मुक्तपणे संचार करणाऱ्या या बहुगुणी सावित्रीच्या लेकीने लिहिलेल्या ” जोतिबाची सावली … सावित्री माऊली ” या नाटकाला मी मनस्वी शुभेच्छा देतो .
जय जोती … जय क्रांती … जय सत्यशोधक …
जयकुमार चर्जन , परतवाड़ा
दि .८ / ८ / २०२४ ऑगस्ट क्रांतीदिन
शिवक्रांती टीव्ही दिन बंधू न्यूज संपा शून्य एक दक सत्यशोधक शंकर लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा




