मंडलनामा क्रमशः 4.अन् शिक्षण सुटले

मंडलनामा क्रमशः
4.अन् शिक्षण सुटले
देश नुकताच स्वतंत्र झाला होता. संयुक्त महाराष्ट्र अजून अस्तित्वात
यायचा होता. जालना शहर तत्कालीन हैदराबाद स्टेटमध्ये होते. शिक्षणाचे
महत्त्व लोकांना पटत होते. काही जणांना पटून सुद्धा शिकता येत नव्हते. कारण
त्यांच्याकडे शिक्षणासाठी पैसे नव्हते. काहीजण प्राथमिक शिक्षण पूर्ण करत, पण
पुढील शिक्षणाच्या सोयी सर्वत्र नसल्याने अनेकांची शाळा सुटायची. यातूनही
कोणी पुढच्या वर्गात गेलाच तर त्याकाळातील सामाजिक चालीरितीनुसार
बालविवाह केले जात. लग्न झाल्यानंतर कोण शिकणार? आजूबाजूच्या
अशा वातावरणात मी वाढत होतो. शाळेत जात होतो. इतरांप्रमाणेच माझ्याही
शिक्षणात अडथळे येत होते. आम्ही एकटेच गरीब होतो व इतर श्रीमंत होते,
असे नव्हते. त्यामुळे सर्वांप्रमाणेच माझे शिक्षण सुरू होते. पण माझ्या शिक्षणात
जरा जास्तच अडथळे आले, असे मला वाटते. तेव्हा सर्वांना शाळेची फी भरावी
लागत असे. जी काही चार, आठ आणे फी असेल, ती नियमित भरण्याची
माझ्या कुटुंबाची ऐपत नव्हती. त्यामुळे चौथी, सातवी व नववी, असे तीन वेळा
मला शाळा सोडावी लागली. त्याला इतर कारणेही होती. पण मुख्य कारण
फीचे होते. एकीकडे शिकून कोण मोठा कलेक्टर होणार, अशी इतरांची भावना.
दुसरीकडे झाले तेवढे पुरे, आता त्याची शाळेची फी भरायची नाही; आम्ही जीव
तोडून काम करायचे व त्या पैशातून याची फी भरायची, असे घरातील काही
सदस्यांचे मत होते. त्यांचेही खरेच होते. त्या परिस्थितीत जगण्यासाठी एक एक
पैसा महत्त्वाच्या होता. यामुळे माझ्या शिक्षणात तीन वेळा खंड पडला. पण का
कोणास ठावूक मला शाळेत जावे वाटायचे. थोडी समज आल्यानंतर प्रगतीची वाट शिक्षणातूनच सापडणार आहे, असे लक्षात आले. त्यामुळे मी शिकायची जिद्द कधीच सोडली नाही. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले. आईचा पाठिंबा होताच. नववीनंतर खंडित झालेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा शाळेत गेलो. मी
शिकत असलेल्या मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये दहावीचा वर्ग नव्हता. त्यावर्षी जुनी अकरावीची पद्धत बंद होऊन एस. एस. सी. बोर्ड स्थापना झाले. माझी शिक्षणातील प्रगती व आवड लक्षात घेऊन काही नातेवाईक व शेजाऱ्यांनी मला दहावीकरिता औरंगाबादला पाठवावे, असे आई-वडिलांना सुचवले. फक्त आई सोडून इतर कोणी या मताचे नव्हते. हा औरंगाबादला जाणार म्हणजे जास्तीचा खर्च कसा करायचा, अशी त्यांना चिंता. विशेषतः माझ्या भावांना. त्यामुळे त्यांचा विरोध होता, पण माझा हट्ट व आईचा पाठिंबा यामुळे मला औरंगाबादला पाठवायचे ठरले. माझ्याप्रमाणे इतर विद्यार्थी औरंगाबादला शिकायला जाणार होते. औरंगाबादच्या चेलीपुरा हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. दलालवाडीत एक खोली भाड्याने घेऊन एकाच वर्गातील आम्ही तिघं राहत होतो. दलालवाडीच्या पलीकडे भंग्यांची वस्ती. खोलीच्या आजूबाजूला अभ्यासाचे वातावरण नव्हते. मला याची सवय होती. आम्ही राजाबाजारातून चालत चेलीपुरा हायस्कूलमध्ये जात असू. आई मला कसे बसे जमा करून, इतरांच्या नजरेस पडणार नाही, अशी काळजी घेत जमेल तेवढे पैसे देत असे. त्यातून माझा औरंगाबादचा खर्च भागत होता. काटकसर करावी लागायची. मी चेलीपुरा हायस्कूलमध्ये चांगलाच रमलो. तेथील वातावरणही छान होते. औरंगाबाद शहर जालन्यापेक्षा मोठे. शिक्षक छान शिकवायचे, त्यांनी शिकवलेले मला समजायचेही. मी एकपाठी असल्याने शिक्षकांनी एकवेळा सांगितले तरी लक्षात राहायचे. गणित व विज्ञान हे माझे आवडीचे विषय. या विषयांतील माझी प्रगती पाहून शिक्षक अनेकवेळा मला माझ्याच वर्गावर शिकवायला सांगायचे. माझा ओढा या दोन विषयाकडे होता. मला त्याचे फळ परिक्षेत मिळाले. मी एस. एस. सी. परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तम गुण घेऊन पास झालो. गणितात मिळाले शंभरपैकी शंभर गुण !
निकालाच्या दिवसाची अत्यंत कटू आठवण आजही विसरलो नाही. हा दिवस विद्याथ्यर्थ्यांसाठी अत्यंत उत्सुकतेचा असतो. त्यातल्या त्यात दहावीच्या निकालाची सर्वजण वाट पाहत असतात. मी प्रथम श्रेणीत पास झालो. गणितात शंभर पैकी शंभर गुण, पण तो दिवस माझ्यासाठी सर्वात वाईट ठरला, दहावीत
मंडलनामा ।
प्रथम श्रेणी मिळवूनही माझे शिक्षण याच दिवशी कायमचे थांबले. त्यामुळे हा दिवस माझ्या जीवनातील सर्वात वाईट दिवस आहे.
त्या दिवशी घडलेल्या घटना माझ्या काळजावर कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. त्या मी कधीच विसरू शकणार नाही. निकालाच्या दिवशी तुरपई, काच-बटणाचे एवढे काम होते की, मी मान वर करायलाही फुरसत नव्हती. मला निकाल पाहायला जायचे आहे, असे सांगूनही मला कोणी कामातून सोडण्यास तयार नव्हते. हा नापास होणार, अशी त्यांना खात्री. माझा जीव वर-खाली होत होता. आई-वडील आणि काम करण्याचा भावांनी दिलेला आदेश धुडकावून निकाल बघायला जाण्याची हिंमत नव्हती. शिवाय निकाल बघण्यासाठी औरंगाबादला जाण्यासाठी पैसे कोठून आणायचे? हा प्रश्न होताच. त्याकाळी वर्तमानपत्रे दहावी, बारावीचा निकाल छापत, उत्तीर्ण झालेल्या
सर्वांचे परीक्षा क्रमांक त्यात असत. एकाकडून वर्तमानपत्र मिळवून तृतीय श्रेणीच्या यादीत परीक्षा क्रमांक पाहिला. तो नव्हता. काळजात धस्स झाले. दहावी पास झालो तरच पुढे शिकता येणार होते. मी एक क्षण निराश झालो. का कोणास ठावूक मी प्रथम श्रेणीतील क्रमांक पाहिले व आश्चर्याचा धक्काच बसला. मी प्रथम श्रेणीत पास झालो. मी ही वार्ता आनंदाने घरातील सर्वांना सांगितली. वर्तमानपत्र दाखवले. पण त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आईला खूप आनंद झाला. वडील गप्पच. शिक्षण म्हणजे आळशी लोकांचा शौक, असा मोठ्या तीन भावांचा समज. हा दहावी पास झाला म्हणजे कॉलेजला जाणार. त्याच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार आमच्यावरच पडणार, त्यासाठी आम्हाला जास्त काम करावे लागणार, अशी त्यांची भावना.
मी दहावी पास झालो तर पुढील शिक्षणासाठी मदत करणार, असा शब्द औरंगाबादला जाताना तीन भावांनी दिला होता. पण निकाल लागल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला. निकालाचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा. परंतु, हा दिवस माझ्या जीवनातील प्रचंड वादावादीचा व कधीच न विसरता येणारा ठरला. भावांनी मला पुढे शिकण्यास मनाई केली. आई समोरही पुढील खर्चाचा विषय होताच. मी माझ्या परीने भावांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. ते ऐकण्यास तयार नव्हते.
मी सुद्धा इरेला पेटलो. घरून पैसे मिळो ना मिळो उच्चशिक्षण घेणारच असा निर्धारच केला. मला गणित व विज्ञान विषयात असलेली आवड,मिळालेली प्रथम श्रेणी व घरची ओडग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन मी मुंबईत ‘व्हीजेआयटी’ मध्ये तांत्रिक शिक्षण घ्यावे, असा सल्ला काही जणांनी दिला, हे साल होते १९६६. मलाही हा सल्ला पटला. कारण वर्ष, दोन वर्षांचा डिप्लोमा करून नोकरी मिळू शकणार होती. शिवाय खूप शिकायचे म्हणजे काय शिकायचे ? याची स्पष्टता नव्हती. त्यामुळे मला हा सल्ला पटला.
आमचे एक नातेवाईक तेव्हा मुंबईत आकाशवाणीमध्ये नोकरीला होते. माझी शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन मी मुंबईत शिकावे, असा त्यांचाही आग्रह होता. मी एके दिवशी रेल्वेने त्यांच्याकडे गेलो. तिकीटाचे पैसे कसे तरी जमवले होते. आवश्यक समान घेऊन मी मुंबईत पोहोचलो. त्यांनी कुर्त्यातील कसाईवाड्याजवळ माझी राहण्याची सोय केली. येथे जनावरे कापली जायची. प्रचंड दुर्गंधी. लहान शहरातील रहिवासी असलो तरी, आमच्या घराचा परिसर स्वच्छ व टापटीप होता. आम्ही स्वच्छ राहायचो. त्यामुळे तेथे कसाईवाड्याजवळ राहणे मला नरकात राहिल्यासारखे वाटायचे. पण, पर्याय नसल्याने तेथे राहणे भाग होते. मी थोडाच तेथे दिवसभर राहणार होतो. कॉलेजला जाण्याचे स्वप्न पडले असल्याने मी हवेत होतो. शिवाय कॉलेजनंतर उदरभरणासाठी काही तरी कामधंदा करावा लागणार होता. त्यामुळे मी येथे अंग टेकण्यापुरताच येईन. थोडी सुस्थिती आल्यानंतर दुसरीकडे राहण्यासाठी जाईन, इत्यादी इमले स्वप्नांत चढत होते. पुढे काय होणार आहे याची मला काहीही कल्पना नव्हती. तरुण होतो. नुकतेच विसावे वर्ष पार केले होते. माझ्या स्वप्नांना पंख फुटत होते. मुंबईत आल्यामुळे माझी स्वप्नं पूर्ण होणार, अशी खात्री वाटत होती.
त्या नातेवाईकाने माझी राहण्याची सोय केलीच शिवाय दादरमध्ये एका इलेक्ट्रिकल दुकानात कामही मिळवून दिले. प्रवेश प्रक्रियेला अजून उशीर होता. ‘व्हीजेआयटी’ला प्रवेश घ्यायचा हे मी जवळपास नक्की केले होते. दुकानात मन लावून काम करत होतो. याच पैशातून मला प्रवेश घेता येणार होता. अल्पावधीतच दुकानमालकासोबत गट्टी जमली. प्रवेशाचे दिवस जवळ येत होते. मी माहिती काढत होतो. शिवाय औरंगाबादच्या एका अधिकाऱ्याकडे पाहिलेली इतर मागास प्रवर्गाची (ओबीसी) यादी डोक्यात घोळत होती. त्या यादीत मुसलमानांतील चार जातींची नावे होती. मुसलमानात जाती नाहीत. पण त्या यादीत ‘जुलाह’ ही जात होती. ‘जुलाह’ कापड विणत असत. आम्ही ‘अन्सारी’; कापडच विणायचो, म्हणजे ‘जुलाह’च ! दलित विद्यार्थी जात
प्रमाणपत्र काढून सवलती घेतात हे मला माहीत होते. मुसलमानांनी जात प्रमाणपत्र कसे काढायचे याची माहिती नव्हती. त्यावेळी जालन्यात काही मुसलमानांकडे व घरी चौकशी केली. त्यांनी मुसलमानात जाती नसतात, तू गप्प राहा, असा सल्ला दिला. म्हणजे सवलतीच्या आघाडीवर माझे काही होणार नव्हते.
‘व्हीजेआयटी’ मध्ये प्रवेश घेण्याचे मांडे मनात खात असताना एके दिवशी
माझा एक भाऊ मुंबईत येऊन धडकला. शाळा, कॉलेज गुंडाळून ठेव व चुपचाप माझ्यासोबत जालन्याला चल, असे त्याने फरमावले. मी त्याला विरोध करण्याएवढा मुजोर झालो नव्हतो. माझ्या दुकानमालकाने व त्या पाहुण्याने भावाला समजावून सांगितले. पण, तो मला जालन्याला घेऊन जाण्यावर ठाम होता. माझ्या समोर दुसरा पर्याय नव्हता. मी चंवृगबाळे आवरून जालन्याला जाणाऱ्या रेल्वेत बसलो. माझी स्वप्नं उधळली गेली. दहावीत प्रथम श्रेणी मिळवूनही त्या दिवशी माझे शिक्षण कायमचे थांबले.
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

