सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.14

सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.14
जाधव
दादोबा बळवंतराव
(२४ मार्च १८९०-२२ फेब्रुवारी १९५६)
कोल्हापूरकर सत्यशोधक रामचंद्र बाबाजी जाधव ऊर्फ दासराम यांच्या भावकीतील आणि दासराम समकालीन एक कोल्हापूरकर सत्यशोधक दादोबा बळवंतराव जाधव कसबेकर हे एक सत्यशोधक होत. दादोबा जाधवांचे आणि दासरामांचे मूळ गाव कसबेबावडा, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर हे होय. पुढे जाधवांच्या पूर्वजांनी कोल्हापूर येथे वास्तव्य केले. दासराम आणि जाधवांची कोल्हापुरात ताराबाई रस्त्यावर जाधव गल्लीत (बाबुजमाल) समोरासमोर घरे होती. अशा या जाधव गल्लीत दिनांक २४ मार्च १८९० रोजी दादोबांचा जन्म झाला. पुढे इ. स. १९०५ ला शिरोळ येथील राधाबाई गावडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मात्र १९२९ साली प्लेगच्या साथीत राधाबाई निवर्तल्या. पुढे त्यांनी शिरोळ येथील रघुनाथ पाटलांच्या बहिणीशी दुसरे लग्न केले. मात्र त्याही १९३४ साली वारल्या.
कोल्हापूर येथे शिक्षण संपवून त्यांनी मुलकी परीक्षा दिली. या परीक्षेत पास होऊन इ. स. १९१६ ला शिरोळ येथील मुन्सफ कोर्टात आठ रुपये पगारावर नोकरी पत्करली. पुढे जयसिंगपूर, राधानगरी, काटकोळ आदी ठिकाणी नोकरी करून इ. स. १९४५ला ते सेवानिवृत्त झाले. दादोबांना कुस्तीचाही छंद होता.
कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाचे सोळावे अधिवेशन दिनांक २७ मे १९५० रोजी ‘दीनमित्र’ कार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष दासराम होते. तेव्हा दासराम यांच्या खांद्याला खांदा लावून दादोबांनी या अधिवेशनासाठी परिश्रम घेतले असावेत. दादोबांचे दिनांक २२ फेब्रुवारी १९५६ रोजी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या प्रजा साप्ताहिकाने दिनांक ५ मार्च १९५६ रोजी त्यांच्या अनुषंगाने एक लेख प्रसिद्ध करून दादोबांना श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे दिनांक ३ मार्च १९५६ रोजी सत्यशोधक शाखा कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी गंगावेशीतील, महात्मा फुले चौकातील सत्यशोधक समाजमंदिरात विशेष बैठक आयोजित करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.




