डॉ. दिगंबर बोबडे सर मु.पो. हरकी निमगाव, ता. माजलगाव, जि.बीड निसर्गात विलीन झाले. आपल्या कार्यास विनम्र अभिवादन.

अत्यंत दुःख:द
सत्यशोधक चळवळ मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जिवंत ठेवणारे, अंधश्रद्धा न बाळगणारे, कर्म कांड न करता सत्य वागणारे, सत्यशोधक चळवळीतील खरा निखारा, सत्यशोधक समाजाचे असंख्य विधिकर्ते तसेच कार्यकर्ता घडविणारा एक मार्गदर्शक डॉ. दिगंबर बोबडे सर मु.पो. हरकी निमगाव, ता. माजलगाव, जि.बीड निसर्गात विलीन झाले. आपल्या कार्यास विनम्र अभिवादन.
डॉ दिगंबर बोबडे सर आणि माझे नाते खरेच जगावेगळे होते, डॉ बोबडे सर आणि माझी समोरासमोर कधीही भेटलो नाही. पण आम्ही एका विचाराने जोडले गेलो होतो. मी त्यांना प्रत्यक्ष भेटू शकले नाही याची खंत मला कायम राहील. पण डॉ बोबडे सर यांची एक आठवण माझ्याकडे कायम राहील ते म्हणजे त्यांनी मला लिहिलेले पत्र. आणि ते कायम जपून ठेवणार आहे. कारण अशी माणसे खुप दुर्मिळ असतात, स्वतः च्या विचारांवर ठाम असणारे आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या विचारांना बळ देऊन जगणारे. आणि अशा दुर्मिळ माणसाने माझ्यासारख्या सामान्य मुलीला लिहिलेलं पत्र हे खरंच खूप मोठी पावती आहे असं मी समजते. डॉ बोबडे सर यांनी मला १२ जानेवारी २०१९ रोजी मला त्यांनी पत्र लिहिले. ते पत्र जेव्हा पोस्टाने माझ्या घरी आले
तेव्हा आश्चर्य वाटले की त्यापुर्वी तर त्यांची साधी तोंड ओळख देखील नव्हती, फोनवर देखील कधी बोलणे नव्हते झाले. मग त्यांना माझा पत्ता कसा मिळाला असेल. आणि त्यांनी वयाच्या ७९व्या वर्षी मला वैचारिक पत्र लिहावे ही गोष्टच खूप विचार करायला लावणारी आहे. त्या पत्रात त्यांनी माझं तोंड भरून कौतुक केले आहे, विशेष म्हणजे माझ्या भाषण करण्याच्या कलेचे त्यांना कौतुक होते, तसे ते पत्रात देखील मेंशन केले आहे. त्यांच्या पत्रानी माझ्या वरील जबाबदारी खऱ्या अर्थाने वाढली. तेव्हा मला जाणीव झाली की आपण सामाजिक कार्य करत असताना आपल्याला वाटत राहतं आपल्याकडे कोणाचं लक्ष नसेल किंवा कोणी आपलं कौतुक करणार नाही. पण त्यांच्या पत्राने मला ही जाणीव करून दिली आपण आपलं कार्य करत असताना
असे अनेक डोळे आपल्याकडे पाहत असतात आपलं आचरण, विचार, भाषण या सर्व गोष्टी बारकाईने आपल्याकडे पाहत असतात. म्हणून सामाजिक कार्य करत असताना भान ठेवून बेभान काम करणं गरजेचं असतं. माझ्या कडून त्यांच्या अनेक अपेक्षा त्यांनी त्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.
पहा ना वैचारिक नातं हे किती श्रेष्ठ असतं, ज्यांना आपण कधी भेटलो नाही, बोललो नाही. अशा व्यक्तींनी देखील आपल्याकडून आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अपेक्षा करणे खूप मोठी गोष्ट आहे. किंवा त्यांचा आपल्यावर किती मोठा विश्वास आहे हे यातून स्पष्ट होते. त्यात त्यांनी इतिहास संशोधक हरी नरके सर आणि इतिहास संशोधक मा.गो.माळी सर यांचा देखील उल्लेख केला आहे. त्याचबरोबर चलो बुध्द की ओर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंतराव उपले सर यांचा देखील उल्लेख केला आहे. मनुवाद आणि बौद्ध धर्म यांच्यातील फरकच जणू त्यांनी या पत्रातून मला सांगितला असावा.. म्हणून मी माझे लग्न २६ डिसेंबर २०२१ रोजी सत्यशोधक पद्धतीने केले. यांचा मला अभिमान आहे. डॉ शेवटी मला सुचवतात की, “तुम्ही सांगितले तर मी माझ्या शक्तीप्रमाणे कार्य करील.”
म्हणजे मी वयाने त्यांच्या पेक्षा इतकी लहान आणि डॉ ७९ वर्षाचे असूनदेखील त्यांना मी सांगितल्यावर कार्य करण्याची त्यांची इच्छा(लहान मोठा हा विचार त्यांच्या मनाला शिवला देखील नाही तरी माझ्या आदेशाची वाट पाहत होते) आणि या वयात देखील कार्य करण्याची ऊर्जा याने मी भारावून गेले. मी त्या दिवशी पासून त्यांची मी फॅन झाले. त्यांना फोनवर बऱ्याच वेळा बोलले, वैचारिक देवाण-घेवाण खूप वेळ झाली. आणि अशा महान व्यक्तीच्या जाण्याची बातमी ऐकून मन सुन्न झाले. वाटले शरीराने भले डॉ बोबडे सर जरुर थकले असतील पण त्यांचे विचार, कार्य उर्जा ही १८ वर्षाच्या पोराला ही लाजवेल अशी होती. त्यांचे पत्र हीच माझी ऊर्जा समजून या पुढील मी कार्य करेल हीच खरी डॉ बोबडे सर यांना आदरांजली ठरेल.
अशा सत्यशोधक चळवळीचा खरा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. या सत्यशोधक निखाऱ्याला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली…
💐💐🙏🏻🙏🏻🥹🥹
[टीप:- सोबत डॉ बोबडे सर यांनी पोस्टाने पाठवलेले पत्र जोडत आहे.]




