प्रचंड संतुलित वातावरणामध्ये उत्कृष्ट आणि अतिउच्च प्रतीची खते वापरून प्रत्येक क्षण निगराणी करत जर एखाद्या कुंडीमध्ये गुलाबाचे टपोरे फुल फुलले तर त्याचे फारसे कौतुक वाटत नाही..

प्रचंड संतुलित वातावरणामध्ये उत्कृष्ट आणि अतिउच्च प्रतीची खते वापरून प्रत्येक क्षण निगराणी करत जर एखाद्या कुंडीमध्ये गुलाबाचे टपोरे फुल फुलले तर त्याचे फारसे कौतुक वाटत नाही..
मात्र ऊन वाऱ्याचा मारा सोसत , मातीतून अंकुरून वर येण्यासाठी आपल्याला कुठलाही आधार असणार नाही याची जाणीव असतानाही टरारून कोंभ जिद्दीने वर येतो तेव्हा खडकाळ माळरानावर उगवलेल्या साध्या गवताच्या पात्यावरही प्रेम करावसं वाटतं…
खरंतर 16 व 17 व वर्ष म्हणजे आयुष्याला आकार देणारे वर्ष. या वळणावर वळण सकारात्मक मिळालं तर आयुष्य वळणदार होतो वळण चुकलं तर मात्र आयुष्याचा वाळवण व्हायला वेळ लागत नाही…
कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तरी आपला विवेक हरवता कामा नये. चांगुलपणावर असणारी निष्ठा आणि सात्विक मूल्य आपण जपली पाहिजे. हा संस्कार मागील सहा महिन्यांपासून ज्या वैभवीच्या ठाई आपण सगळ्यांनी बघितला. तिचा बारावीचा निकाल कौतुकास्पद आहे ..!
एकीकडे वडिलांची अत्यंत क्रूर हत्या.. दहशत.. राज्यभरातले आक्रोश मोर्चे जर आपल्या वडिलांसाठी निघत असतील तर आपण स्वतः लढण्यासाठी मैदानात उतरलं पाहिजे याचं आत्मभान आणि त्याच वेळेला वडिलांनी आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांची जाण जपत वैभवीने बारावीची परीक्षा दिली. तिचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला लागला.
वैभवी खूप खूप अभिनंदन शुभेच्छा… मला खात्री आहे आयुष्यातल्या कुठल्याही कठीण प्रसंगांमध्ये तुझा विवेक हरवणार नाही… प्रचंड कटूतेचे अनुभव जरी तुझ्या वाट्याला आले असले तरीसुद्धा इथून पुढच्या आयुष्यात चांगुलपणाचा गोडवा तू जतन करशील… खूप खूप अभिनंदन…
उंच उंच झेप घे.. तुझ्या झेपेच्या कवेत आकाश आहे… !
_प्रा सुषमा अंधारे

