जंतरमंतर आंदोलनानंतर अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा; ‘हे फक्त ट्रेलर होतं, आता देशभर आंदोलन’

दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) आंदोलनानंतर संस्थापक अभिजीत दीपके यांनी पुढील लढ्याची दिशा स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, जंतरमंतरवरील आंदोलन हा केवळ प्रारंभ होता आणि सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास देशव्यापी आंदोलन उभारले जाईल.
6 जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे CJP ने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. नीट परीक्षा, पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता हे या आंदोलनाचे प्रमुख मुद्दे होते. या आंदोलनात विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत जंतरमंतरवरील कार्यक्रमाला “पुढे काय होणार आहे याचा ट्रेलर” असे संबोधले. त्यांनी दावा केला की युवकांचा आवाज आता अधिक मोठ्या प्रमाणावर देशभर पोहोचवला जाईल.
दीपके यांनी केंद्र सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात कारवाई झाली नाही किंवा त्यांनी राजीनामा दिला नाही, तर देशभर निदर्शने, मोर्चे आणि आंदोलनांची मालिका सुरू केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
त्यांनी स्पष्ट केले की आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण राहील. आंदोलनकर्त्यांनी संविधानावर विश्वास ठेवावा, हिंसा टाळावी आणि लोकशाही मार्गानेच लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यापूर्वीही CJP ने आंदोलनासाठी ‘पुस्तक, तिरंगा आणि शांततापूर्ण सहभाग’ यावर भर दिला होता.
दरम्यान, जंतरमंतर आंदोलनानंतर CJP च्या वाढत्या प्रभावाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विविध माध्यमांच्या वृत्तांनुसार या चळवळीला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असून युवकांमध्ये ती वेगाने लोकप्रिय होत आहे.
अभिजीत दीपके यांनी सांगितले की, ही लढाई केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्यापुरती मर्यादित नाही. शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रिया आणि युवकांच्या रोजगाराशी संबंधित प्रश्नांवर व्यापक बदल घडवून आणणे हेच आंदोलनाचे अंतिम उद्दिष्ट आहे.




