महात्मा पुळे साहित्य आणि चळवळ क्रमशः ९

तिरस्कृत मराठी माणसांना त्यांनी उचलून धरले आहे. ह्यात धैर्याइतकाच आधुनिक विचारांचा भाग होता. हा माणूस तत्कालीन इंग्रजी शास्त्राप्रमाणे केवळ लिहिणारा- वाचणारा नसून सर्वस्वी नव्या प्रकारच्या जीवघेण्या चळवळीसाठी पायपीट करणारा, नाना त-हेच्या माणसांमध्ये मिसळणारा, दुष्काळी कामे हाती घेणारा, त्या काळातल्या बुरसटलेल्या लोकांकडून एकदोन आण्यांपासून वर्गण्या जमा करून, त्याचा चोख हिशेब ठेवून लोकोत्तर व लोकांत अप्रिय अशी स्त्री व शूद्र यांच्या शिक्षणाची कामे करणारा, स्वतः पुस्तके लिहून, प्रती करून, छापून स्वतः खपवणारा, शूद्रांस न्याय मिळवून देण्याकरिता किंवा शूद्रांच्या हुशार मुलांपैकी “गरिबांची मुले फुकट घेण्याकरिता” अर्ज करून, खेटे घालून कामे यशस्वी करून घेणारा-अशा प्रकारचा हा माणूस असल्यामुळे त्याच्या लेखनात पंडिती कमकुवतपणा नाही. अशा दगदगीत ब्राह्मणाविरुद्ध लिहिणे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत भर घालणेच होते. त्यांच्या पुस्तकांच्या मुखपृष्ठांवर “शूद्र शेतकऱ्यांचे बचावाकरिता केले आहे.” “लोकहितार्थ केले” अशा सूचना आहेत. ह्यावरून लिहिणे हा त्यांना प्रबोधनाचा एक भाग वाटत होता हे स्पष्ट आहे. त्यांच्या कार्याचा भूमिनिष्ठ पसारा पाहता त्यांचे लेखन संपूर्णपणे भूमिनिष्ठ होणे अपरिहार्य वाटते.
खरे तर १८६९ पासून आपले बहुतेक सर्व लेखन करणारे, फुले हे संस्कारक्षम पूर्वायुष्यात ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली नवीन विचार शिकले. त्यांच्या बहुतेक ग्रंथावर (तृतीय रत्न १८५५, गुलामगिरी १८७३, सत्सार नंबर १:१८८५, सत्सार नंबर २:१८८५, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक १८८९) मिशनरी संवादपद्धतीचा आणि मिशनरी हिंदुत्वविरोधी विचारसणीचा प्रभाव आहे. त्यातील कित्येक प्रश्नोत्तरे प्रत्यक्ष मिशनरी प्रचार वाङ्मयातही त्यांच्याआधी वापरलेली दिसतात. प्रश्नचिन्हानंतरच “जसे” “कारण” “म्हणून” असे जुळणी करणारे शब्द थेट मिशनरी मराठी शैलीतून फुल्यांनी घेतलेले दिसतात. अपेक्षित नसलेली परंतु उत्तरासाठीच केवळ अगोदर आलेली प्रश्नार्थक विधानेही मिशनरी मराठीचीच पद्धत आहे. विरोधी पवित्रा घेऊन मांडलेली विधाने ही जॉन बनियनची खास शैलीही फुल्यांमध्ये दिसते.
फुल्यांच्या गद्यात मिशनरी मराठी शैलीचा आणि ग्रामीण लोकात प्रिय असलेल्या शाहीर-तमासगीर-गोंधळी-वहीवाले इत्यादींच्या मौखिक पारंपरिक शैलीतील मिश्र गद्यपद्याचा संयोग झालेले आणखी एक रूप दिसून येते. “विद्येविना मति गेली, मतिविना नीति गेली, नीतिविना गति गेली; गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र




