तामीळनाडू-ओबीसी पॅटर्नची सर्वच पक्षांना भीती?

*तामीळनाडू-ओबीसी पॅटर्नची सर्वच पक्षांना भीती?*
*ओबीसी पक्ष उभा राहीला तर ब्राह्मण-मराठ्यांचे पक्ष*
*व त्यांचे बी टीमवाले पक्ष आडवे होतील.*
*ओबीसी-मराठा संघर्षाचे आठवे ‘राजकीय’ पर्वः लेखांक-12*
*ओबीसीनामा-33. लेखकः-प्रा.श्रावण देवरे*
*बी-टीमवाल्यांची फडणवीसी षडयंत्रे* (प्रकरण-2)
ओबीसी-मराठा संघर्षाच्या आठव्या पर्वातच (2018 सालीच) आम्ही ओबीसींचा स्वतंत्र व स्वाभिमानी राजकीय पक्ष उभा करू शकलो असतो. परंतू प्रस्थापित ब्राह्मण मराठ्यांचे पक्ष व त्यांच्यासाठी बी टीम म्हणून काम करणारे फुले-आंबेडकरवादी पक्ष या सगळ्यांचे एका सिद्धांतावर एकमत आहे. *आणी तो सिद्धांत म्हणजे- ‘‘बाकी सगळ्या समाजघटकांनी आपापले राजकीय पक्ष उभे केले तरी चालतील, परंतू फक्त ओबीसींना आपला स्वतःचा राजकीय पक्ष उभा करू द्यायचा नाही,’’* हाच तो सिद्धांत! बाकी सगळ्या प्रस्थापित (मराठा-ब्राह्मणांचे) पक्ष व बी टीम, सी-टीमवाले फुलेआंबेडकरवादी पक्ष किंवा मुस्लीम पक्ष एकमेकांना आधार देऊन, उघड वा छुपी युती करून एकमेकांना सांभाळून घेतात. आणी जेव्हा जेव्हा ओबीसींचा स्वतंत्र पक्ष उभा करण्याचा प्रयत्न सुरू होतो, तेव्हा तेव्हा हे सर्व प्रस्थापित पक्ष व त्यांचे बी टीम, सी-टीमवाले वाले चहुबाजूंनी ओबीसीवर तुटून पडतात.
2018 सालचाच अनुभव सांगतो- तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांनी (मराठा) गायकवाड आयोगाच्या शिफारशी स्वीकारून मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेताच वेगवेगळ्या 10 ओबीसी जातीच्या नेत्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊन फडणवीस सरकारविरोधात आंदोलन उभे केले. आझाद मैदानावर मोर्चे, धरणे आंदोलन, सर्व पक्षीय आमदार-खासदारांना भेटून ओबीसींची बाजू मांडणे, विरोधी पक्ष नेते, मुख्यमंत्री व विविध मंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेणे, महाराष्ट्रात काही मोठ्या शहरांमध्ये ओबीसी परिषदा घेऊन जनजागृती करणे आदि सर्व प्रकारची आंदोलने आम्ही त्या काळात केलीत. त्याही काळात मराठा गुंडांची दहशत काम करीत होती. माळी महासंघाचे अध्यक्ष *शंकरराव आण्णा लिंगे* यांना 200 मराठा गुंडांनी घेरून त्यांच्यावर शाईफेक केली व धक्का-बुक्की करून कपडे फाडण्यात आलेत. शाईफेकीमुळे एक डोळा व धक्काबुक्कीमुळे इतर अवयवांना बरीच दुखापत झालेली होती. तीन ऑपरेशन्स केल्यावर त्यांची तब्ब्येत सुधारली. त्यावेळी लिंगे आण्णांचे 63 होते. बापाच्या वयाच्या लिंगे आण्णांवर हात उचलतांना मराठा गुंडांना काडीइतकीही लाज-शरम वाटली नाही. ओबीसी योद्धा उपोषणकर्ते *मंगेश ससाणे व मृणाल ढोलेपाटील* यांना पुण्यात मराठा गुंडांनी केलेली मारहाण व नंतर एडव्होकेट *गुणरत्न सदावर्ते* साहेबांना भर कोर्टात न्यायधिशांसमोरच मराठा गुंडांनी केलेली मारहाण, *मराठा गुंडांकडून फोनवर आई-बहिणींवरून अश्लील शीव्या देण्याचा प्रकार रोजच घडत होता.* अशा जीवघेण्या दहशतीच्या वातावरणात जीवावर उदार होऊन आम्ही ओबीसी आंदोलनाची खिंड लढवीत होतो. हा सर्व अनुभव आम्ही त्याच वेळी *‘‘तो पंधरा दिवसांचा थरार!’’* या नावाने 5 लेखांक लिहून प्रकाशित केला आहे. हे पाच लेख मी पुन्हा कधीतरी पुनर्प्रकाशित करीन, त्यावरून आपणास समजून येईल की त्या काळात मराठा गुंडांची दहशत आमच्या जीवावर किती बेतलेली होती.
हे ओबीसी आंदोलन सुरू असतांना आमच्यात ओबीसी पक्ष स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू झाली. त्यावेळी भाजपची बी-टीम असलेल्या पक्षामध्ये काम करणार्या एका *‘‘डफलीवाल्याला’’* आमच्यात जाणीवपूर्वक घुसविण्यात आले व त्याने आमच्यात फूट पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. पुण्याला ओबीसी परीषद घेऊन तेथे ही फूट जाहीर करण्याचे त्याने ठरविले होते. *परंतू या नाजूक व विश्वासघातकी प्रसंगी मी स्वतः श्रावण देवरे, बालाजी शिंदे, प्रकाश शेंडगे व खरमाटे या ओबीसी नेत्यांनी अत्यंत संयमी भुमिका घेऊन डफलीवाल्याच्या या षडयंत्रावर मात केली व आमच्यातील नेत्यांची एकजूट अधिकच भक्कम झाली.* या डफलीवाल्याचा बोलवता धनी कोण, त्याच्या बी टीमचा मालक कोण व त्याच्या मालकाचा आणखीन एक वरचा मालक कोण, याची चर्चा करण्याची गरज नाही, कारण महाराष्ट्रातील जनता हे सर्व जाणून घेण्याइतपत समजदार निश्चितच झालेली आहे. अशा *बी टीमवाल्यांना कधी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरून आदेश येतात तर कधी नागपूरच्या रशीम बागेतून संदेश येतात.*
हा पहिला राजकीय अनुभव 2018 चा आहे. दुसरा अनुभव अगदी ताजाच आहे. 20121 पर्यंत कुणीही आंदोलक ओबीसी नेता ‘‘ओबीसी पक्ष’’ स्थापन करीत नव्हता, म्हणून मी स्वतःच *‘‘ओबीसी राजकीय आघाडी’’* नावाचा पक्ष स्थापन करून 2024 च्या निवडणूकीची तयारी सुरू केली. 2024 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 4 वेळा दौरे केलेत, प्रत्येक जिल्ह्यात व बर्याच तालूक्यात बैठका, सभा, परिषदा आयोजित करून निवडणूकीसाठी उमेदवारही तयार केलेत. राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतू निवडणूक जाहीर होताच अचानक प्रकाश शेंडगेंनी वेगळा ओबीसी पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. मी व बालाजी शिंदे आम्ही दोघे 2018 साली प्रकाश शेंडगेंना ओबीसी पक्ष स्थापन करण्याचा आग्रह करीत होतो. त्यावेळी प्रकाश शेंडगेंनी टाळाटाळ केली होती. कदाचित त्यांना *‘ईडी-सीडी’* ची भीती वाटत असावी. कारण त्या काळात भाजपविरोधी नेत्यांना ईडी-सीडी लावण्याचा जोरदार कार्यक्रम चालू होता. *त्यामुळे शेंडगेंसारखे उद्योगपती व अब्जोपती स्वतंत्र ओबीसी पक्ष स्थापन करण्याची हिम्मत करूच शकत नव्हते.*
मग आता 2024 च्या निवडणूका जाहीर होताच शेंडगे अचानक ओबीसी पक्ष स्थापन करतात, तेव्हा त्यांना इडी-सीडीची भीती वाटत नाही का? आता भीती वाटणारच नाही, कारण जे इडी-सीडी लावतात, त्यांच्याच आदेशाने शेंडगेंनी ओबीसी पक्ष स्थापन केला आहे. *श्रावण देवरेंच्या ओबीसी राजकीय आघाडीला महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्यांना अपशकून करण्यासाठी, ओबीसी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी व तामीळनाडू पॅटर्नचा ओबीसींचा पक्ष उभा राहूच नये* यासाठी फडणवीस-शिंदे यांनी रचलेले हे षडयंत्र होते व आहे. मी महाराष्ट्रभर फिरून जे उमेदवार तयार केले होते, त्यांना 5-5 लाखांचे अमीष देऊन माझ्यापासून तोडण्यात आले होते. *प्रकाश शेंडगेंचा ओबीसी पक्षही फडणवीस-शिंदेंची “सी-टीम” आहे, हे मी येथे नमूद करून ठेवीत आहे.*
2018 साली ओबीसी चळवळीत फूट पाडण्यासाठी बी टीमचा एकच डफलीवाला घुसविण्यात आला होता. आता 2024 साली आख्खी बी टीमच ओबीसी चळवळीत घुसते आहे. *जरांगेला व जरांगेच्या ‘‘सगे-सोयरे’’ शब्दाला पाठींबा देऊन एकट्या ओबीसीला ‘सगे-सोयर्या’च्या फासावर लटकावण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना देणारी फुले-आंबेडकरवादी(?) बी-टीम अचानक यु-टर्न घेऊन ओबीसी आरक्षणासाठी यात्रा काढते आहे, या मागील फडणवीसी षडयंत्र समजून घेण्याइतपत ओबीसी आता हुशार झाला आहे.* हे असे वारंवार का घडते, याचा विचार सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ता केव्हा करेल? मी ही अपेक्षा ‘‘सर्वसामान्य’’ कार्यकर्त्यांकडून करतो आहे. कारण ओबीसीमधील बहुतेक सर्वच मेरीटवाले विद्वान कवडीमोल भावात विकले गेले आहेत. कुणी विधान परीषदेच्या आमदारकीसाठी विकले गेलेत, कुणी कुठेतरी केव्हातरी तिकिट मिळेल या आश्वासनावर विकले गेले आहेत. कुणाला आपला मुलगा एखाद्या संस्थेत शिपाई म्हणून नोकरीला लावायचा आहे. कुणाला आपल्या सुनेचा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, तर एक म्हणतो- ‘थांबा सर, माझा एवढा प्रोजेक्ट पूर्ण होऊ द्या, नंतर मी तुमच्याच बरोबर काम करेन!’ दुसरा म्हणतो- ‘सर, माझा हात दगडाखाली अडकलेला आहे, मी तुमच्या सोबत काम केले तर मला उद्याच जेलमध्ये टाकतील!’ *अशा सगळ्या दगडाखाली चेंगरलेल्या लोकांकडून काही नवा विचार करण्याची अपेक्षा सोडा आणी तुम्ही स्वतः सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून स्वतःच विचार करा.* आज जे ओबीसी नेते तुम्हाला ‘‘वटवृक्ष’’ वाटतात, ते सर्व आतून सडलेले आहेत. आतून पोखरले गेलेल्या वट वृक्षाखाली उभे राहीलेत तर तो वटवृक्ष हलक्याशा वार्याच्या झूळकीने उन्मळून पडतो व ओबीसी पोरका होतो.
ओबीसी पुन्हा पुन्हा पोरका होऊ नये म्हणून आपण आता नव्या वाटा, नवे विचार शोधले पाहिजेत, त्याची चर्चा पढील लेखांकात करू या! तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
*-प्रा. श्रावण देवरे,*
संस्थापक-अध्यक्ष,
*ओबीसी राजकीय आघाडी,*
*संपर्कः* 88301 27270
*ईमेलः* obcparty@gmail.com


