फुले+शाहू+आंबेडकरांचा पुतळा उभा करण्यासाठी मनुवादी मदत करतात परंतू सामी पेरियांच्या पुतळ्याला मनुवादी टोकाचा विरोध करतात! असे का?

फुले+शाहू+आंबेडकरांचा पुतळा उभा करण्यासाठी मनुवादी मदत करतात
परंतू सामी पेरियांच्या पुतळ्याला मनुवादी टोकाचा विरोध करतात! असे का?
ओबीसीनामा-36. पेरियारमध्ये असे कोणते क्रांतिकारकत्व आहे?
पुर्वार्धः फुलेआंबेडकरी चळवळ व पेरियार चळवळ यात दोन मुख्य फरक
फुलेवाद, आंबेडकरवाद, छत्रपती शाहू राजे व पेरियारवाद यांचेवर मी आजवर अनेक लेख लिहीले आहेत. परंतू महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच वैचारिक लेव्हलचे विद्वान जे सातत्याने सोशल मिडियावर व प्रिन्ट मिडियात लिहीत असतात व विविध विषयांवर टोकाचा वाद-विवादही घडवून आणतात, छोट्या-मोठ्या मुद्द्यांवरून अक्षरशः भांडत असतात, असे सर्व विद्वान मात्र माझ्या लेखांवर ‘चुप्पी’ साधून असतात. अर्थात सोशल मिडियाकडून माझी ही अपेक्षा नाहीच! कारण सोशल मिडियावर लिहीणारे 99 टक्के नेटकरी हे ‘छिचोरे’ असतात. चार ओळी वाचल्यानंतर पाचवी ओळ वाचण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यामुळे ते वरवरचे टायटल वाचून पोस्ट लिहीणार्याची जात वा धर्म बघून टिका-टिपणी करतात व शिव्या-शापही देतात. आता यांच्यापैकी एखादा छिचोरा असेही म्हणून शकतो की, ‘श्रावण देवरेंचे लेख वाचण्याच्या लायकीचे नसतात.’ आता जे लेख वाचण्याच्याच लायकीचे नसतील तर त्या लेखांवर केलेली कॉमेंट कोणत्या लायकीची समजायची? आणी लेख पूर्ण न वाचता त्यावर कॉमेंट करणं हे सुद्धा लायकी नसण्याचंच लक्षण आहे. सोशल मिडियावरच्या अशा छिचोर्या लोकांना माझे सांगणे आहे की, सोशल मिडियाच्या डबक्याच्या बाहेर फार मोठे मिडिया-विश्व आहे. केवळ डबक्यात राहून डरांव डरांव केल्याने शहाणपण येत नाही.
सोशल मिडियाच्या बाहेर प्रिन्ट मिडियामध्ये वैचारिक व तात्विक लेख प्रकाशित करणारी उच्चदर्ज्याची दैनिके, पाक्षिके व मासिके आहेत, ज्यात माझे हेच लेख मराठी, हिन्दी व इंग्रजीतून प्रकाशित केले जातात. ‘दैनिक महाराष्ट्र टाइम्स’ (मुंबई), ‘दैनिक लोकसत्ता’ (मुंबई), ‘दैनिक पुढारी’ (कोल्हापूर), ‘दैनिक बहुजन सौरभ’ (नागपूर), ‘दैनिक लोकमंथन’ (अहल्यानगर-अहमदनगर), ‘दैनिक दिव्य मराठी’, साप्ताहिक ‘अकलुज वैभव’ (सोलापूर), साप्ताहिक ‘एकससत्ता’ (सोलापूर), त्रैमासिक ‘समाज प्रबोधन पत्रिका’ (कोल्हापूर), पाक्षिक ‘परिवर्तनाचा वाटसरू’ (पुणे-मुंबई), ‘पाक्षिक रयत रक्षक’ (अमरावती), महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘मासिक नवभारत’ (वाई, सातारा), ‘पिपल्स पोस्ट’ (संभाजीनगर औरंगाबाद) ‘हिंन्दुस्थान टाईम्स’ (हिन्दी), ‘Asian Age,’ Enlish (Mumbai), ‘Deccan Chronical’ Enlish (Mumbai), आदि अनेक प्रिन्ट मिडियात माझे वैचारिक लेख प्रकाशित होत असतात. ईलेक्ट्रॉनिक्स टिव्ही मिडियामध्ये वैचारिक चर्चा पॅनल मध्ये माझे नाव नेहमीच असते. त्यात ‘लोकमत-न्युज18’, ‘टिव्ही9 न्युज चॅनल’, ‘झी-24 तास चॅनल’, ‘साम टिव्ही’, ‘जय महाराष्ट्र’, ‘ई-टिव्ही चॅनल’, ‘लोकशाही न्युज चॅनल’, ‘मॅक्स महाराष्ट्र’, ‘The Quint Digital News Channel’, ‘Awaj India Channel’ (Nagpur), ‘Lord Buddha’, ‘Bahujan Sanghatak’, ‘Maharashtra.City’, ‘3Ways Media Tv Channel’, (Mumbai) अशा सर्व जातीधर्माच्या मिडियामधून माझे हेच विचार लेख, चर्चा व मुलाखतींद्वारे प्रकाशित व प्रचारित केले जात आहेत. या पैकी काही प्रसिद्धी माध्यमांच्या संपादकांना व मालकांना मराठा-ब्राह्मण गुंडांकडून व दलित जातीयवाद्यांकडून धमक्या देण्यात आल्यात. ‘श्रावण देवरेला जास्त प्रसिद्धी दिली तर परिणाम वाईट होतील’, अशा आशयाच्या धमक्या गुंडांकडून व जातीयवाद्यांकडून दिल्या गेल्यात. दोन दैनिकांचा अपवाद वगळला तर बाकी सर्व प्रसिद्धी माध्यमांनी या मराठा गुंडांच्या व दलित जातीयवाद्यांच्या धमक्यांना भीख घातली नाही. हे माझे सांगणे छिचोर्या कार्यकर्त्यांसाठी होते. बाकी इतर सुसंस्कृत असलेले विद्वान माझ्या लेखांवर कॉमेंट काय लाईक करायलाही घाबरतात. हे झाले महाराष्ट्रातले उदाहरण! महाराष्ट्राच्या बाहेर काय?
आता माझ्या लेखांचा वैचारिक दर्जा बघता माझे हेच लेख महाराष्ट्राबाहेरील काही दैनिके व मासिकांमध्ये छापून येतात. माननीय चंद्रभान पाल साहेब माझ्या लेखांचे त्वरीत हिंदी भाषांतर करून ते संपूर्ण उत्तर भारतात सोशल मिडियावर पाठवितात. सोशल मिडियातून हेच माझे लेख साभार म्हणून प्रिन्ट मिडिया मध्ये छापले जातात. पालसाहेब हे मुंबईत राहणारे असले तरी ते मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असल्याने त्यांच्याकडे उत्तरप्रदेश, बिहार, प. बंगाल, मध्यप्रदेश आदि हिंदी राज्यातील नेटकर्यांचे व्हाटसप व फेसबुकचे गृप आहेत. दिल्लीहून एकाचवेळी हिंदी व इंग्रजीतून प्रकाशित होणारे ‘‘फॉरवर्ड प्रेस’’ (Forward Press, Delhi) नावाचे आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे मॅगेझिन माझे हेच लेख नियमितपणे प्रकाशित करीत असते. ‘Dalit Voice’ (English, Andhra Pradesh), ‘OBC Voice’ English, Tamilnadu), ‘यादव शक्ती (बिहार व उत्तर प्रदेश) असे अनेक महाराष्ट्राबाहेरील माध्यमे माझे हेच लेख छापत असतात. महाराष्ट्रातले विद्वान मराठ्यांच्या गुंडगिरीला घाबरून माझ्या लेखांवर चुप्पी साधत असतील ते आपण समजू शकतो, पण महाराष्ट्राबाहेरच्या विद्वानांचे काय?
तर, असो! जे आपल्या महापुरूषांच्या वाट्याला आले ते आपल्याही वाट्याला आले तर समजायचे की ‘आपणच त्या महापुरूषांचे प्रामाणिक अनुयायी-कार्यकर्ते आहोत.’ आपल्यावर प्रेम करणार्या व्यक्तींनी सर्टिफिकेट दिले तर ते शंकास्पद असते, परंतू आपल्याला शत्रू अथवा प्रतिस्पर्धी समजणार्या लोकांनी दिलेले सर्टिफिकेट हेच खरे प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र असते. जे समकालीन लोक आपल्याच क्षेत्रातील समकक्ष लोकांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करीत असतात, ते खुजे असतात व दुसर्याची उंची कमी करून आपणच उंच असल्याचे भासवतात. आता हे झालं थोडसं आक्रंदन की अरण्यरुदन! आता आपण आजच्या मूळ विषयाकडे वळू या!
आज आपण नेहमीप्रमाणे चौकटीबाहेरच्या विषयावर चर्चा करणार आहोत. लेखाच्या टायटलमध्ये प्रश्नांकीत विषय आहे. अर्थात या प्रश्नांकीत विषयाची पार्श्वभूमी यापूर्वी अनेक लेखांमध्ये मांडलेली आहे. पण हा विषय मात्र माझ्या डोक्यात आला तो संभाजीनगर-औरंगाबदच्या घटनेमुळे!
संभाजीनगरला लागून असलेल्या वाळूज गाव-शिवारात महाराष्ट्र कॉलेज आहे. या कॉलेजचे प्राचार्य आहेत सुनिल वाकेकर! यांनी आपल्या कॉलेजच्या आवारात सामी पेरियार यांचा पुतळा बसविला आहे. ‘पुतळा अनावरण समारंभास मी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे व मार्गदर्शन करावे’, अशी विनंती वाकेकरांनी मला फोन करून केली. मी त्वरीत होकार दिला. ‘मी एक दिवस आधीच तेथे जाणार असल्याने त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था सुभेदारी रेस्ट हाऊसला केलेली होती. संध्याकाळी जेव्हा ते मला सुभेदारीवर भेटायला आलेत, तेव्हा मी त्यांना दोन प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न असा होता की, तामीळनाडूच्या बाहेर सामी पेरियार यांच्याबद्दल कुणी विचारही करीत नाहीत, महाराष्ट्रात तर अजिबातच नाही. अशा परिस्थितीत तुमच्या मनात सामी पेरियार यांचा पुतळा बसविण्याचा विचार आला कसा?
उत्तरात ते म्हणाले, ‘सामी पेरियार यांचेबद्दल मी वाचले व त्यांचे कार्य समजून घेतले. तुमच्या अनेक लेखांमधून व पुस्तकातून सामी पेरियार यांचे क्रांतिकारक विचार व कार्य वाचले. त्याने मी प्रभावित झालो म्हणून पुतळा बसविण्याचा विचार माझ्या मनात आला.’ दुसरा प्रश्न असा होता की, ‘सामी पेरियार यांचा पुतळा बसविणे सोपे आहे, मात्र पुतळा बसविल्यानंतरचे काम कठीण आहे. पेशवाईची प्रतिक्रांती झालेल्या महाराष्ट्रात या पुतळ्याचे संरक्षण कसे करणार?
दुसर्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यावर प्राचार्य वाकेकरांनी प्रस्तावनेत जे सांगीतले ते धक्कादायक होते. मी कालच्या चर्चेत वाकेकरांना ‘पुतळा बसविल्यानंतर होणार्या त्रासाबद्दल’ बोललो होतो. मात्र प्रस्तावनेत वाकेकर मला उद्देशून म्हणाले की, ‘‘सर, पुतळा बसविण्याच्या आधीपासूनच त्रास सुरू झाला. शासन-प्रशासनावर वरून दबाव आला व त्यांनी मला त्रास देण्यास सुरूवात केली. पोलीस स्टेशनहून मला सारखे फोन यायला सुरू झालेत. रात्री 12 वाजता, कधी रात्री 2 वाजता ‘पोलीस स्टेशनला ताबडतोब या’, असे फोनवरून सांगण्यात येत होते. कलेक्टर कचेरीला परवानगीसाठी वारंवार चकरा माराव्या लागत होत्या. ‘‘तुमच्या विरोधात खूप तक्रारी येत आहेत, शहराचे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे, पुतळा अनावरणाला परवानगी मिळणार नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.’’ अशाप्रकारे वेगवेगळ्या मार्गाने वेगवेगळ्या पद्धतीने धमकावण्याचा प्रयत्न झाला.’’
सुरक्षिततेबाबत बोलतांना प्रा. वाकेकर प्रस्तावनेत पुढे म्हणाले की, ‘‘अनावरण समारंभाचे गुंडांपासून संरक्षण व प्रमुख पाहुण्यांची सुरक्षितता हा माझ्यासमोर फार मोठा प्रश्न होता. पेशवा सरकारच्या पोलीसांवर कसा भरवसा ठेवणार? म्हणून मला सुरक्षेसाठी खाजगी बाऊन्सर नियुक्त करावे लागले आहेत.’’
हे सर्व धक्कादायकच होते. फुलेशाहूआंबेडकरांच्या पुतळ्यांना इतका विरोध कधी झाला नाही, मात्र सामी पेरियार यांना इतका कठोर व आक्रमक विरोध का? याची मुख्य दोन कारणे आहेत, त्याची चर्चा आपण या लेखाच्या उत्तरार्धात करू या!
तोपर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,
ओबीसी राजकीय आघाडी,
संपर्कः 88301 27270

