ठोस आश्वासन नाही, कर्जमाफी धोरण सुधारणानाही; तरीही रोहित पवारांचे उपोषण संपले!

🔥 ठोस आश्वासन नाही, कर्जमाफी धोरण सुधारणा नाही; तरीही रोहित पवारांचे उपोषण संपले!
पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी आंदोलनाची अखेर तिसऱ्या दिवशी सांगता झाली. मात्र उपोषण संपताना शेतकऱ्यांच्या पदरात कोणताही ठोस निर्णय, लिखित हमी किंवा कर्जमाफीचा स्पष्ट शब्द पडला नसल्याने आंदोलनाच्या फलितावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रात्री उशिरापर्यंत मंत्री गिरीश महाजन आणि रोहित पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. २०१९ ची अपूर्ण कर्जमाफी, पीकविमा, शेतमालाला हमीभाव, वीजबिल, दुष्काळ, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, शेतकरी आत्महत्या, सहकारी बँकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा झाली. मात्र चर्चेनंतर कोणतीही मागणी मान्य झाल्याची घोषणा करण्यात आली नाही.
गिरीश महाजन यांनी फक्त २२ तारखेच्या अधिवेशनापूर्वी शिष्टमंडळासह बैठक घेण्याचे आणि उच्चस्तरीय समितीसमोर मागण्या मांडण्याचे आश्वासन दिले. निर्णय नंतर घेऊ, मार्ग काढू, एवढेच सरकारच्या वतीने सांगण्यात आले.
चर्चेदरम्यान गिरीश महाजन यांनी रोहित पवार यांना उपोषणाचा मार्ग चुकीचा असल्याचे स्पष्टपणे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. “तुम्ही आमदार आहात. मुख्यमंत्री आणि शासनाशी थेट चर्चा करून प्रश्न मांडू शकला असता. विधानसभेतही हे मुद्दे उपस्थित करता आले असते,” असे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनाला जवळपास २७ ते २८ आमदारांचा पाठिंबा होता. विविध शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच मनोज जरांगे यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला होता. एवढा मोठा पाठिंबा मिळूनही कोणतीही ठोस मागणी मान्य न करून घेता उपोषण संपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दिवसभर कुटुंबीय, समर्थक आणि अनेक नेत्यांकडून उपोषण सोडण्यासाठी आग्रह करण्यात येत होता. अखेर गिरीश महाजन यांनी आणलेल्या शासकीय पत्राच्या आधारे तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यात आला आणि रोहित पवार यांनी उपोषण मागे घेतले.
नामदेव पायरी येथे दर्शन घेऊन पेढा खाऊन उपोषण सोडण्याची घोषणा करण्यात आली. मात्र शेतकरी वर्गामध्ये आता एकच प्रश्न विचारला जात आहे — तीन दिवसांच्या उपोषणानंतर मिळाले तरी काय?
निर्णय नाही… कर्जमाफी नाही… आर्थिक मदत नाही… फक्त पुढील बैठकीचे आश्वासन!
विशेष म्हणजे आंदोलन अधिक न ताणता संपल्याने प्रशासनावरील ताण, पोलिसांवरील दबाव आणि कायदा-सुव्यवस्थेची चिंता दूर झाली. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आजही कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
📲 7387737801 हा नंबर आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
📩 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा
📺 सबस्क्राईब करा
#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीTV #रोहितपवार #गिरीशमहाजन #शेतकरीआंदोलन #कर्जमाफी #शेतकरी #महाराष्ट्रराजकारण #सत्यशोधकशंकररावलिंगे







